पणजी : सरकारने कॅसिनो, प्रादेशिक आराखडा, खास दर्जा, रोजगार निर्मिती अशा अनेक विषयांबाबत गोमंतकीयांना आश्वासने देऊन फसविले आहे. आम्ही याबाबत सोमवारी सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संघटितपणे सरकारला घेरू व उघडे पाडू, असा इशारा विरोधातील सहा आमदारांनी शनिवारी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत दिला. आमदार विजय सरदेसाई, रोहन खंवटे, विश्वजीत राणे, बाबूश मोन्सेरात, नरेश सावळ व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पत्रकार परिषद घेतली व भाजप सरकारच्या विविध निर्णयांवर व न पाळलेल्या आश्वासनांवर टीका केली. आम्हाला एरव्ही विधानसभेत लोकांचे प्रश्न सरकार मांडूच देत नाही. आम्हाला आवाजच उठवू देत नाही. या वेळी आम्ही स्व. राजीव गांधी आयटी हॅबिटेट, आरोग्य क्षेत्रातील गोंधळ, ओडीपी व प्रादेशिक आराखड्याचा वाद अशा अनेक विषयांबाबत एकत्रितपणे विधानसभेत सरकारला जाब विचारणार आहोत. भाजपचे मंत्री, आमदार रविवार, दि. १३ रोजी ‘घर चलो’ अभियान राबवतील. त्या वेळी लोकांनीही त्यांना जाब विचारावा, असे सरदेसाई म्हणाले. अर्थसंकल्पातून तसेच जाहीरनाम्यातून यापूर्वी दिलेली आश्वासने सरकार पाळतच नाही. कॅसिनो मांडवीबाहेर काढणार, अशी ग्वाही देऊन सरकारने यू-टर्र्न घेतला आहे, असेही ते म्हणाले. साधनसुविधा विकास महामंडळ म्हणजे मोठा घोटाळा असून मिरामार-दोनापावल रस्त्यावर अकारण २00 कोटींचा खर्च साधनसुविधा महामंडळाने केला. कंत्राटदाराला लाभ मिळत राहावा म्हणून कामास विलंब केला गेला. काँक्रिट रस्त्याच्या मधूनच मलनिस्सारण वाहिनी नेली जात आहे. उद्या या वाहिनीत बिघाड झाला, तर पूर्ण काँक्रिट रस्ता फोडला जाईल काय, असा प्रश्न बाबूश मोन्सेरात यांनी केला. सध्या गोवा राज्य १८ हजार कोटींच्या कर्जात बुडाले आहे. गोव्यात जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर १ लाख २० हजार रुपयांचे कर्ज असते. किनारा स्वच्छता कंत्राटही मोठा घोटाळा असून त्याबाबत विधानसभेत आवाज उठवू, असे रोहन खंवटे यांनी सांगितले. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ वाट्टेल तिथे प्रकल्प मंजूर करत सुटले आहे. शेतातही उद्योगांना स्थान दिले जाते. प्रादेशिक आराखड्याचा विचारही केला जात नाही, असे रेजिनाल्ड म्हणाले. आम्ही अधिकृतरीत्या नव्हे; पण अनौैपचारिकपणे महायुती स्थापन केली आहे. आम्ही काही आमदार एकत्र आलो आहोत. म.गो. पक्षाला वाटत असेल, तर त्या पक्षानेही आमच्यासोबत यावे; पण तत्पूर्वी त्या पक्षास भाजपबरोबरची सत्ता सोडावी लागेल. आम्ही किमान समान कार्यक्रम तयार करू, असे सरदेसाई म्हणाले. बालरथांचा विमा भरण्यासाठीही सरकारकडे पैसे नाहीत. बांधकाम खात्याकडे निधी नसल्याने प्रस्ताव मंजूर होत नाहीत. कॅसिनो व माध्यमप्रश्नी सरकारने लोकांना फसवले. ‘घर चलो’ अभियानावेळी लोक निश्चितच भाजपला याबाबत प्रश्न विचारतील, असे आमदार सावळ म्हणाले. (खास प्रतिनिधी)
सरकारविरोधात महायुतीचे बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 02:00 IST