पणजी : येत्या वर्षभरात देशाच्या सुरक्षेच्याबाबतीत अनेक मोठे बदल करण्यात येणार असून या बदलांचा चांगला अनुभव देशवासियांना मिळेल, असे आश्वासनही संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले. ते साखळी येथे आयोजित रवींद्र भवन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. पर्रीकर पुढे म्हणाले की, सध्या देशात व देशाच्या सीमेवर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत़ मात्र, त्यांचा मुकाबला करण्यासाठी देशाची सुरक्षा यंत्रणा सक्षम आहे़ संरक्षणमंत्रिपद हे जबाबदारीचे, तसेच आव्हानात्मक आहे़ त्यामुळे आपल्यावर देण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, पणजीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेमंत शिबिरात उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पर्रीकर यांनी आसाममधील बोडो अतिरेक्यांविरुद्धच्या लष्करी कारवाईचे समर्थन केले. ते म्हणाले की, आसाममधील घनदाट जंगले आणि कडेकपारी या विशिष्ट भौगोलिक रचना असलेल्या प्रदेशात बोडो अतिरेकी गनिमीकाव्याचे तंत्र वापरून हल्ला करतात. निमलष्करी दलाला गनिमीकाव्याच्या तंत्राचे प्रशिक्षण दिलेले नसते. त्यामुळे अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. आसाममधील घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासातच लष्कराला पाचारण करण्यात आले होते. लष्कर जरी कारवाई करीत असले तरी ते गृहखात्याच्या आदेशाखाली कारवाई करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
सुरक्षेबाबत वर्षभरात मोठे बदल : पर्रीकर
By admin | Updated: December 28, 2014 09:38 IST