पणजी : राणे पिता-पुत्रांवर दहा कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करणारे दहेज मिनरल्स खाण कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भालचंद्र नाईक यांचा एसआयटी अधिकाऱ्यांनी पोलीस उपमहानिरीक्षक के. के. व्यास यांच्या उपस्थितीत बुधवारी सुमारे चार तास जबाब घेण्यात आला. खाण घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्थापन झालेल्या एसआयटीने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. भालचंद्र नाईक हे आपल्या आरोपांशी ठाम आहेत. आपल्या एका खाण प्रकरणात लिज परवाना देण्यासाठी राणे पिता-पुत्रांनी वरील लाच मागितल्याचा तसेच आधी आपण ६ कोटी रुपये त्यांना दिल्याचा भालचंद्र यांचा आरोप आहे. उपमहानिरीक्षक व्यास यांनी त्यांना मंगळवारी समन्स बजावले होते. त्यानुसार दुपारी ३ वाजता ते दोनापावल येथे एसआयटी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. तेथून उपअधीक्षक निळू राऊत देसाई यांनी त्यांना पोलीस मुख्यालयात आणले. मला पोलिसांना समन्स काढले. त्यामुळे उपस्थित राहणे भाग होते, असे नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पत्रकार परिषदेत आपण जे आरोप केले, त्यावर आपण ठाम आहे आणि तेच एसआयटी अधिकाऱ्यांनाही सांगितले असल्याचे ते म्हणाले. नाईक यांनी काँग्रेस भवनातून प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते तसेच त्यांचे पुत्र आमदार विश्वजीत राणे यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान, नाईक हे आपल्या आरोपांशी ठाम राहिल्यास राणे पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हे नोंदविले जातील, असे व्यास यांनी मंगळवारी जाहीर केले होते. त्यामुळे आता या दोघांविरुद्ध गुन्हे नोंदविले जातात काय, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दुसरीकडे या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी केला आहे. राणे यांनी या प्रकरणी भालचंद्र यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला घालण्याचा इशारा दिलेला आहे. दरम्यान, आपण तक्रार मागे घ्यावी, यासाठी दबाव येत असल्याचे नाईक यांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती मिळाली आहे. (प्रतिनिधी)
भालचंद्र नाईक यांचा चार तास जबाब
By admin | Updated: July 3, 2014 01:18 IST