पणजी : एखाद्या ठिकाणी वाहतूक पोलीस उपलब्ध नसला तरी फेसबुक, वॉट्स अॅप यासारख्या सोशल नेटवर्किंग साईट्समुळे वाहतूक नियमभंगाचे प्रकार उघड होत आहेत. अशा प्रकारांची दखल घेऊन गेल्या आठ महिन्यांत सातजणांना पोलिसांच्या वाहतूक विभागाने चलन दिले आहे. छायाचित्रांसह सोशल नेटवर्किंग साईट्सवरून ज्या तक्रारी येतात, त्यांची दखल पोलिसांचा वाहतूक विभाग घेतो. जर कुणी व्यवस्थित वाहन पार्क केलेले नसेल किंवा जर कुणी नो-पार्किंग क्षेत्रात आणून वाहन ठेवलेले असेल, तर त्याचे छायाचित्र मोबाईलवरून टिपून लोक फेसबुक व वॉट्स अॅपवर टाकतात. या छायाचित्रांची पोलिसांचा वाहतूक विभाग लवकर दखल घेतो. गेल्या वर्षी अशा प्रकारच्या छायाचित्रांच्या आधारे पंधराजणांना चलन देण्यात आले, तर यंदा आतापर्यंत सातजणांना चलन दिले गेले आहे, अशी माहिती मिळाली. फेसबुकवर पोलिसांच्या वाहतूक विभागाने स्वतंत्र पेज तयार केले आहे. त्या पेजवर जी छायाचित्रे पोस्ट केली जातात, त्यांची दखल घेतली जाते. ज्या वाहनधारकाने नियमभंग केला आहे, त्यास ठरावीक दिवसांत दंड भरण्यास सांगितले जाते व चलनसाठी जर कुणी प्रतिसाद दिला नाही, तर तो विषय मग न्यायालयाकडे सोपविला जातो. यामुळे एखाद्या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने वाहतूक नियमांचा भंग करायला आपण मोकळे आहोत, असे वाहनधारकांना मानता येणार नाही. विविध शहरांमध्ये कॅमेरेही आहेत. कॅमेऱ्यांद्वारेही वाहतूक नियमभंगाचे प्रकार टिपले जातात. दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या विभागाप्रमाणेच सरकारच्या वाहतूक खात्याकडेही फेसबुक किंवा वॉट्स अॅपद्वारे आलेल्या तक्रारींची दखल घेण्याची व्यवस्था आहे का, अशी विचारणा या प्रतिनिधीने वाहतूक संचालक अरुण देसाई यांच्याकडे केली असता, त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. आम्ही फक्त एसएमएसद्वारे आलेल्या तक्रारींची दखल घेतो व त्यानुसार कारवाई करतो. आॅनलाईन तक्रार सेवेची नियमितपणे देखरेख केली जाते, असे त्यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)
वाहतूक नियमभंग करताना सावधान!
By admin | Updated: September 6, 2014 01:24 IST