पाणीटंचाई तीव्र : काम प्राथमिक अवस्थेतच अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या नवेगाव व वेलगूर येथील पाण्याच्या टाकीचे काम अर्धवट होऊन मागील दोन वर्षांपासून बंद झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची शुद्ध पिण्याच्या पाण्याची तहान लांबणीवर पडत आहे. मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या कामात पाण्याच्या टाकीचे पिल्लरचे काम झाले असून ते केवळ प्राथमिक अवस्थेत आहे. सन २०१२-१३ मध्ये ग्राम पंचायत वेलगूर अंतर्गत वेलगूर व नवेगाव येथील पाणीपुरवठा योजनेसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत नवेगाव येथे ६५ लाख व वेलगूर येथे ५९ लाख रूपये निधी पाण्याच्या टाकीसाठी मंजूर झाला व कंत्राटदारामार्फत कामही सुरू झाले. दोन्ही ठिकाणी विहिरही बांधण्यात आली. परंतु त्यानंतर या कामाला ग्रहण लागले. काम पूर्ण झाले नाही. सद्य:स्थितीत केवळ प्राथमिक स्थितीत काम असून कंत्राटदारामार्फत कोणत्याही हालचाली झाल्याचे दिसत नाही. गावकऱ्यांनी या कामासंदर्भात विचारणा केली असता कंत्राटदारांनी मुदत वाढवून घेतली आहे व काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. योजना पूर्ण करण्यासाठी अवजारे, तांत्रिक मनुष्यबळ नसल्याने काम ठप्प आहे. पाण्याच्या टाकीसाठी पिल्लर जमिनीवर दिसत आहेत. परंतु ते अजूनही पुढे गेलेले नाही. वेलगूर ग्राम पंचायत आलापल्ली-वेलगूर जि. प. क्षेत्रात असून जि. प. चे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
वेलगूर, नवेगावच्या पाणीटाकीचे काम बंद
By admin | Updated: April 26, 2017 01:08 IST