मालेवाडा : गडचिरोली जिल्हा विविध जातींच्या वृक्षांनी व्यापलेला आहे. जिल्ह्यातील जंगलात विविध जातीच्या औषधी वनस्पतींची भरमार आहे. परंतु जिल्ह्यात वनोपजावर आधारित उद्योगधंदे नसल्याने येथील युवक रोजगाराच्या शोधात मोठमोठ्या शहरात भटकत आहे. शिकूण सवरूनही आदिवासी युवक बांधकाम व्यवसाय, हॉटेल, पापड, लोणची, मसाले, कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक आदी प्रकारच्या दुय्यम व्यवसायाकडे वळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात वनोपजावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याची गरज आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वनविभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.जिल्ह्यात वनसंपदा असूनही उद्योगांचा अभाव आहे. वनातून सहज उपलब्ध होणाऱ्या वनोपजावर उद्योग उभारण्याची गरज जिल्ह्यात वनोपज बांबू व तेंदू यांचा वाटा सर्वाधिक आहे. यावर्षी पेपर मिलची बांबू कटाई मजुरांच्या मजुरीसंबंधी वाटाघाटी करण्यातच अडकून आहे. मजुरांच्या मजुरी ठरविण्यातच सदर प्रक्रिया अडकली आहे. त्यामुळे या रोजगारासंबंधी मजूर साशंक आहेत. बांबू कटाईनंतर तेंदूपत्ता हा सर्वात मोठा रोजगार म्हणून येथील नागरिकांना उपलब्ध होतो. जिल्ह्यातील अनेक कुटुंब उन्हाळ्याच्या दिवसात तेंदूपत्ता संकलनाचे काम करतात. मात्र मजुरांना बोनस देण्याऐवजी वनरक्षक, वनपाल आपापले वेतन वाढविण्याच्या कामात गुंतल्याने वनमजुरांना यापुढे बोनस मिळणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात औषधी वनस्पतींचीही भरमार आहे. परंतु विविध औषधी वनस्पतींच्या वापराबाबत नागरिकच अनभिज्ञ आहेत. डिंक, लाख, राळ, चारोळी, बिबा, हिरडा, आवळा, बेहडा, अनंतमूळ, करंज बी, पळस बी यासारख्या औषधी वनस्पती जिल्ह्याच्या वनात मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यातील वनोपज आदिवासी बांधव गोळा करतात. मात्र अल्पकिंमतीत सदर वनोपज औषधी कंपन्यांना कमी भावात कच्च्या मालाच्या स्वरूपात विकून टाकतात. वनविभागाने सदर वनोपज अधिकृतरित्या खरेदी करून स्थानिक लोकांना विक्रीचे अधिकार दिले तर त्यातून प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. डिंक प्रतवारी करून लाख, चारोळी यासारखी उत्पादने मध, मोहफूल आदी गौण वनोपज महिला बचत गट संयुक्त वनव्यवस्थापन समित्यामार्फत गोळाकरून विक्री केल्यास रोजगार निर्मिती होऊ शकेल. रिकाम्या हातांना शेतीच्या रिकाम्या हंगामात जोडधंदा उपलब्ध होऊ शकेल. रेशीम कीडपालन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय यातूनही आर्थिक उत्पन्न वाढीस हातभार लावू शकतो. वनोपजावर उद्योग उभारल्यास जिल्ह्यात रोजगार निर्मितीस वाव आहे.
वनोपजातून रोजगार निर्मितीस वाव
By admin | Updated: October 28, 2014 22:57 IST