कमलापूर : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
गॅस सिलिंडर योजनेचा बट्ट्याबोळ
आरमोरी : वनविभागामार्फत नागरिकांना तसेच वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना अनुदानावर गॅस सिलिंडर कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र, संपल्यानंतर सिलिंडर भरण्यासाठी लांब अंतराच्या गावांकडे जावे लागते. गॅस सिलिंडर रिफिलिंगचे ठिकाणाचे योग्य नियोजन नसल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
आष्टी : विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी आहे.
दिना धरणाचे खोलीकरण करा
चामोर्शी : जिल्ह्यातील सर्वांत मोठा सिंचन प्रकल्प म्हणून दिना प्रकल्पाची ओळख आहे. अनेक वर्षांपासून उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे जलसाठवणूक क्षमता कमी झाली आहे. तलावाचा उपसा व कालवे दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी आहे.
मार्गावरील खांबामुळे रहदारीस अडथळा
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
अनेक गावांना विजेची प्रतीक्षा
भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावांत विजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर ताराही ओढण्यात आल्या. मात्र, यावर वीजपुरवठा सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिक अद्यापही विजेच्या प्रतीक्षेत आहेत.
कोरचीतील रस्ते झाले आहेत खड्डेमय
कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगविले आहे. गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी आहे. खड्ड्यांमुळे अपघात हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
मंडळ कार्यालयांचे काम अपूर्णच
गडचिरोली : महसूल विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात ४० मंडळ कार्यालयांची उभारणी दीड कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आली होती. काही ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेत आहे, तर काहींची कामे पूर्ण झाली आहेत.
स्रेहनगरातील कचराकुंड्या लावा
गडचिरोली : शहरातील स्रेहनगरात कचराकुंडीचा अभाव असल्याने परिसरात सर्वत्र घाण पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. न.प.ने सदर समस्येकडे लक्ष देऊन स्रेहनगरात कचराकुंड्या लावण्याची मागणी होत आहे.
भाजीपाला लागवडीचे क्षेत्र वाढले
गडचिरोली : भाजीपाल्याला चांगला भाव मिळत आहे. त्याचबरोबर, धान पीक निघाल्यानंतर त्याच शेतीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शेतकरी आता भाजीपाला पिकाकडे वळत चालला आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
आरमोरी : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ग्रा.पं. प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना त्रास होत असल्याने, सदर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
विभागीय शिक्षण मंडळ गडचिरोलीत द्या
गडचिरोली : नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभाजन करून गडचिरोली येथे नवे शिक्षण मंडळ सुरू करण्यात यावी. पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यांचा समावेश असलेले स्वतंत्र शिक्षण मंडळ देण्यात यावे व त्याचे मुख्यालय ठेवण्यात यावे.
डाक विभागाचे मुख्य कार्यालय द्या
गडचिरोली : केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारे डाक विभागाचे प्रधान कार्यालय चंद्रपूर येथे आहे. या कार्यालयामार्फत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा कारभार चालतो. त्यामुळे प्रधान कार्यालय गडचिरोली येथे देण्यात यावे, अशी गडचिरोलीवासियांची मागणी आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांची रुंदी वाढवा
आरमोरी : तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील रस्त्यांची रुंदी अत्यंत कमी आहे. या रस्त्यांवरून एकच वाहन जाऊ शकते. दुसरे वाहन जाताना अडचणी येतात.