दोघे गंभीर : मौशीखांबनजीकची घटना; रुग्णालयात उपचार गडचिरोली : तालुक्यातील मौशीखांबलगतच्या तलाव वळणावर शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींपैकी दोघे गंभीर आहेत. तिघांनाही गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सुनील कुमरे (२०), बालाजी कुमरे (२५) रा. चरवीदंड ता. कुरखेडा, गोपीनाथ वलादे (३६) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. तिघेही दुचाकीने चांभार्डा येथे लग्नसमारंभाकरिता आले होते. परंतु काही कामाकरिता मरेगाव मार्गे मौशीखांबकडे ट्रिपलसिट दुचाकीने निघाले. दरम्यान दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मौशीखांब पलिकडील तलावालगतच्या वळणावर रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या कलवटच्या सिमेंट चौथऱ्याला दुचाकी धडकली. यात तिघेही जण जखमी झाले. तिघांपैकी सुनील कुमरे याच्या दोन्ही गुडघ्याला जबर मार लागला. तर बालाजी कुमरे याचे एक हात व एका पायाला जबर दुखापत झाली. तर गोपीनाथ वलादे याला किरकोळ जखम झाली. तिघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. परंतु अपघातातील जखमी सुनील कुमरे याची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्याने त्याला नागपूर येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सुनील कुमरे याला सायंकाळपर्यंत नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
दुचाकी अपघात तिघे जखमी
By admin | Updated: April 23, 2017 01:30 IST