गडचिरोली : गडचिरोली शहरातील पटेल सायकल स्टोअर्स ते आठवडी बाजार या मार्गावर चारचाकी वाहनांना तसेच जड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आहे. नगरपरिषदेने काही वर्षांपूर्वी कठडे लावून बंदी घातली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी आता बारगळली आहे.
पुलाअभावी रहदारीस अडथळा
जिमलगट्टा : जिमलगट्टापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या मेडपल्ली गावालगतच्या नाल्यावरील पूल पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला तेव्हापासून प्रशासनाने या ठिकाणी नवा पूल उभारला नाही. परिणामी मेडपल्ली व येदरंगावासीयांना जाण्या-येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
सर्व तालुक्यांना अग्निशमन यंत्र द्या
गडचिरोली : १० लाख लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यांमध्ये १६४८ गावे आहेत. घटनांच्यावेळी मदतीला धावून जाणारे केवळ चार अग्निशमन वाहने जिल्ह्यात आहेत. प्रत्येक तहसीलला अग्निशमन यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
अहेरीत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा
अहेरी : शहरात सार्वजनिक मूत्रिघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मूत्रिघर तयार केले आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे.
रिक्त पदांमुळे आरोग्य केंद्राच्या कामांवर परिणाम
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. परिणामी आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे. रिक्त पदे भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
आरमाेरी : दिवसेंदिवस आरमाेरी शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा नगरपरिषदेकडे केली आहे. मात्र, याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे.
कचऱ्याच्या ढिगांमुळे स्वच्छतेची ऐसीतैशी
गडचिरोली : तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्याच्या अगदी बाजूला कचऱ्याचे ढीग आहेत. त्यामुळे स्वच्छतेची वाट लागत असल्याचे दिसून येत आहे. नालीचा उपसा झाल्यानंतर गाळ वेळेवर उपसला जात नाही.
मामा तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी
वैरागड : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरूस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
इंटरनेटअभावी शेकडो ग्राहक त्रस्त
सिराेंचा : तालुक्यातील बहुतांश गावात इंटरनेसेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, काही बँकांमध्येही हिच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत राहावे लागते. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्याची मागणी
आरमोरी : तालुक्यातील अनेक गावांत पाणीपुरवठ्याची बोंब आहे. पाण्याच्या टाक्या असून त्या शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. पाणीपुरवठा योजना मंजूर असतानाही पाणी मिळत नसल्याने अनेक नागरिक त्रस्त आहेत.