गडचिरोली : शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे बसस्थानक ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत एकतर्फी वाहतूक करण्यात आली आहे. मात्र या मार्गावरचे अतिक्रमण हटविले नसल्याने वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. अशातच मोठमोठे ट्रेलर मार्गावरून जात असल्याने वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे.
शहरातील मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात एसटी, दुचाकी वाहने व मालवाहू वाहनांची गर्दी राहते. एका बाजूचे खोदकाम केले असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. दोन्ही बाजूची वाहने एकाच मार्गाने जात असल्याने सर्वप्रथम या मार्गाच्या बाजूचे अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. मात्र नगरपरिषद तसेच बांधकाम विभागाने अतिक्रमण हटविले नाही. अजूनही दुकाने रस्त्यावरच आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. दोन मोठी वाहने समोर आल्यानंतर वाहतुकीची कोंडी होते. नगरपरिषदेने पुढाकार घेऊन अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. महामार्गाचे बांधकाम जवळपास एक वर्ष चालणार आहे. तेवढे दिवस शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे रस्त्यावरचे अतिक्रमण हटविणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
धानोरा, आरमोरीवरून येणारे ट्रक मूलकडे जाणारे असल्यास त्यांना सेमाना बायपास मार्गे नेण्याचा सल्ला वाहतूक पोलिसांमार्फत दिला जातो. धानोरा मार्गावरही एकतर्फी वाहतूक आहे. विशेष म्हणजे गडचिरोली शहरातून एकही बायपास मार्ग नसल्याने ट्रक शहरातूनच न्यावे लागते. बायपास मार्गाचे बांधकाम झाल्याशिवाय येतील वाहतुकीची समस्या सुटणार नाही.