गडचिरोली : तालुक्यातील पारडी येथील प्रीती कृषी केंद्राचे संचालक खताची बेभाव विक्री करीत असल्याबाबतचे वृत्त लोकमतने शनिवारी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारीच धाड टाकली. खत व बियाण्यांच्या विक्रीमध्ये अनियमितता आढळून आल्याने कृषी केंद्रात साठा करून ठेवलेल्या १ लाख २२ हजार ६२४ रूपयांचे खत पुढील आदेशापर्यंत विक्रीस प्रतिबंध घालण्यात आले आहे. तर बियाणे विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. पारडी येथील प्रीती कृषी केंद्राचे संचालक ईश्वर मुळे हे शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे २९८ रूपयांचेच युरिया खताचे व ९०० इफको खताचे बिल देत होते. मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून युरियासाठी ३४० ते ४०० रूपये व इफको खतासाठी १००० ते १२०० रूपये घेत होते. याबाबतची तक्रार गावातील शेतकऱ्यांनी केल्यानंतर लोकमतने वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हा कृषी अधिकारी एस. टी. पठाण, गडचिरोली तालुका गुण नियंत्रक निरीक्षक राजनहिरे यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी धाड टाकली. धाडीदरम्यान कागदपत्रांची तपासणी केली असता, बियाण्यांचे उगम परवाने नसल्याचे आढळून आले. त्याचबरोबर खत विक्री अहवाल सुद्धा सादर केला नव्हता. रासायनिक खत नियंत्रक आदेश १९८५ मधील खंड ३५ (१) (बी) व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील ईसीए ३ (२) सी या तरदुतीचा भंग करणारी आहे. त्यामुळे संबंधित कृषी केंद्र चालकाचा बियाणे विक्री परवाना निलंबित करण्यात आला. त्याचबरोबर कृषी केंद्रात असलेला खतसाठा कृषी विभागाचा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत विक्री न करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर कारवाई जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. पी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)
पारडीतील कृषी केंद्राचा परवाना निलंबित
By admin | Updated: August 21, 2016 02:37 IST