प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा या केंद्रासह इतर काही केंद्रांवर आदिवासी विकास महामंडळामार्फत खरिपातील धानाची खरेदी करण्यात आली. मात्र गर्दी वाढल्याने आणि ऑनलाइन प्रक्रियेला वेळ लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे जवळपास २ ते ३ हजार क्विंटल धान अमिर्झा केंद्राच्या व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यात ऑनलाइन खरेदी प्रक्रिया न करताच गुदामात ठेवले. दरम्यान, ३१ मार्चला खरिपातील धान खरेदीची मुदत संपली तरी ऑनलाइन प्रक्रिया केलीच नाही. परिणामी ते धान परत नेण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली.
यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदीची मुदत वाढवावी यासाठी शासनाकडे पत्रव्यवहारही केला. परंतु अजूनपर्यंत धान खरेदीबाबत तोडगा निघाला नाही. महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या चुकीचा फटका शेतकऱ्यांना देऊ नका आणि लवकर धान खरेदी करा, अशी मागणी पं. स. सदस्य आणि भाजपचे तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे यांनी केली आहे.