शुक्रवारी जाणार संपावर : जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदनगडचिरोली : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यात याव्या अन्यथा २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या एक दिवसाच्या लाक्षणिक संपात सहभाग घेतला जाईल. यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास धरणे आंदोलन केले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केलेली अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी, सातव्या वेतन आयोगाचा लाभ राज्यातील कर्मचाऱ्यांना त्वरीत द्यावा, सर्व विभागातील रिक्त पदे भरावी, वाढती महागाई कमी करावी, कामगार कायद्यात बदल करू नये, सरकारी आस्थापणांचे खासगीकरण थांबविण्यात यावे, नवीन रोजगार निर्माण करून बेरोजगारी कमी करावी, सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करावी, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस. के. चडगुलवार, कार्याध्यक्ष ए. आर. गडप्पा, सरचिटणीस बी. एस. मेश्राम, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहणकर, चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष लतिफ पठाण, सरचिटणीस किशोर सोनटक्के यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे धरणे
By admin | Updated: September 2, 2016 01:19 IST