१ मे महाराष्ट्र दिनी रात्री आरमोरी तालुक्यात मेघगर्जनेसह चक्रीवादळ व गारपिटीसह वादळी पाऊस आला. या पावसाने आरमोरी, अरसोडा, रवी, मुलूरचक, जोगीसाखरा, पळसगाव, शंकरनगर, रामपूर, कनेरी व इतर भागांतील उन्हाळी धान, मका, आंबा व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. आरमोरी तालुक्यातील विविध भागातील उभे व अंतिम टप्प्यात कापणीच्या स्थितीत आलेले धान पीक वादळी पावसाने जमिनीला टेकले असल्याने पिकाची नासाडी झाली. तसेच मका पिकाचेही नुकसान झाले. आंबा व इतर फळपिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. अनेक घरावरची कवेलू व छप्पर उडाले. नुकसान झालेल्या अरसोडा, रवी व मुलूरचक भागाला भेट देऊन काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी यांनी नुकसानीची पाहणी केली. वादळ व गारपिटीसह आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने परिसरातील ाशेतकरीही धास्तावले आहेत. सुरू असलेल्या संकटाच्या मालिकेने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी यांनी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात व मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
नुकसानीची पाहणी करताना त्यांच्यासोबत शालिक पत्रे व अनेक शेतकरी उपस्थित होते.