गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या अनेक आधारभूत धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी करण्यात आली आहे. खरेदी करण्यात आलेल्या धानाची उघड्यावर साठवणूक करून ठेवलेली आहे. मात्र धान भरडाईची प्रक्रिया बंद असल्याने अद्यापही उघड्यावर ठेवलेल्या धानाची उचल करण्यात आली नाही. उघड्यावर साठवून ठेवलेल्या धानाची उचल होत नसल्याने पावसाळ्यात धान भिजून खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान होऊ शकते.
यापूर्वी सुद्धा जिल्ह्यातील अनेक खरेदी केंद्रावरील उघड्यारील धानाची उचल न केल्यामुळे हजारो क्विंटल धानाची नासाडी होऊन धान खराब झाले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शासनाच्या करोडो रुपये पाण्यात गेले. मात्र अधिकारी या बाबीकडे गंभीरतेने बघत नाही.
त्यामुळे खरेदी केंद्रावरील उघड्यावर साठवुन ठेवलेल्या धानाची तात्काळ उचल करून भरडाई करण्यात यावी़ अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी अन्न व पुरवठा विभागाचे सचिव, आदिवासी विकास विभागाचे सचिव व नाशिकचे आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थकपकीय संचालक यांच्याकडे केली आहे.