गर्दी : लग्न सोहळ्याच्या आयोजनामुळे ठोक स्वरूपात भाजीपाल्यांची विक्री अधिक गडचिरोली : कांदे व लसूनचा जुना साठा काही प्रमाणात शिल्लक आहे. आता कांदे व लसूनचे नवे उत्पादन आल्याने बाजारात कांदे, लसूनची आवक वाढली आहे. परिणामी गडचिरोली येथील रविवारच्या आठवडी बाजारात कांदे व लसूनचे भाव गडगडले होते. मात्र गेल्या एक ते दीड महिन्यापासून भाजीपालांचे दर स्थिर आहे. आजच्या आठवडी बाजारात भाजीपालाचे दर २० ते २५ दिवसांपूर्वीचेच जुने भाव कायम असल्याचे दिसून आले. सध्या उन्हाळ्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र विवाह सोहळ्याची धूम जोमात सुरू आहे. मंगल कार्यालयही आता पूर्णत: बूक झाले आहे. लग्न सोहळ्याच्या आयोजनामुळे गडचिरोली येथील आठवडी बाजारात ठोक स्वरूपात भाजीपाल्याची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. विवाह कार्य असणाऱ्या कुटुंबातील अनेक व्यक्ती रविवारच्या आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करीत असल्याचे दिसून आले. रविवारच्या आठवडी बाजारात वांगे १५ रूपये किलो, टमाटर २० रूपये किलो, आलू १५ रूपये किलो, चवळीच्या शेंगा ३० रूपये किलो, कोहळा २० रूपये किलो, फणस ४० रूपये किलो, भेंडी ३० रूपये किलो, कारले ४० रूपये किलो, फूलकोबी ३० रूपये किलो, हिरवी मिरची ३० रूपये किलो दराने विकली जात होती. गडचिरोलीच्या आठवडी बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने कांद्याचे भाव उतरले होते. १५ रूपये किलो दराने कांदे विकले जात होते. तर लसून ८० रूपये किलो दराने विकले जात होते. भाजीपालाचे भाव स्थिर असले तरी गडचिरोलीच्या आठवडी बाजारात रविवारी ग्राहकांची गर्दी होती. लाल मिरची या बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणली होती. मिरची बाजारातही ग्राहकांची गर्दी दिसून आली. (स्थानिक प्रतिनिधी)
कांदे, लसून गडगडले; भाजीपाला स्थिर
By admin | Updated: April 3, 2017 02:22 IST