एटापल्ली : एटापल्ली तालुक्यात शुक्रवारी काही मार्गावर नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर झळकले. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.एटापल्ली ते कसनसूर रस्त्यावर हालेवारावरून कसनसूरकडे जाताना हे बॅनर नक्षलवाद्यांनी लावलेले आहेत. या बॅनरवर पोलीस विभागाच्या जनजागरण मेळाव्याला नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन माओवादी संघटनेने केले आहे. तसेच जनजागरण मेळाव्यात शिकाऱ्याच्या हातचे जेवण जेवू नका, असेही आवाहन करण्यात आले आहे. सिंदेसूर, मेंढरी येथे चकमकीत शहीद झालेल्या सदस्यांचे रक्त वाया जाऊ देऊ नका, असेही या बॅनरवर नमूद करण्यात आले आहे. जल, जमीन, जंगल व सन्मान याची लढाई लढण्यासाठी सज्ज व्हा. माओवाद्यांचे राज्य आल्याशिवाय आदिवासींचे कल्याण नाही, असा संदेश या बॅनरवरून नागरिकांना देण्यात आला आहे. या बॅनरमुळे परिसरातील गावात तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये कमालीची दहशत दिसून आली. (तालुका प्रतिनिधी)
एटापल्ली तालुक्यात नक्षली बॅनर झळकले
By admin | Updated: September 6, 2014 01:54 IST