गडचिरोली : सावली तालुक्यातील एक महिला अक्षय्य तृतीयानिमित्त आरमोरी येथे आपल्या मुलाकडे आली होती. ती परत जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स बसने निघाली असता, या बसमधील कर्मचाऱ्याने बस वाकडी परिसरातील जंगलाकडे नेऊन महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार गडचिरोली पोलीस ठाण्यात २२ एप्रिल रोजी दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात ३५४ (अ) (ब), ३६६, ३४२, ३२३ भादंविच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकातून मूलकडे जाण्यासाठी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स बस एमएच ४९ जे २३६६ निघाली. १० ते १२ महिला या गाडीत होत्या. त्यांना कोटगल गावात उतरविल्यानंतर गाडीत चालक, वाहक व एक महिला प्रवासी होते. काही दूर अंतरावर ट्रॅव्हल्समधील क्लिनर उतरून गेला. त्यानंतर सदर गाडीतील महिलेला भीती वाटत असल्याने तिने उतरण्याचा प्रयत्न केला.यावेळी चालकाने मज्जाव केला व गाडी जंगलाच्या दिशेने नेली. तेथे सदर महिलेशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तेथून महिलेने कशीबशी आपली सुटका केली. सदर जंगल परिसरातून महिला भटकत वाकडी गावात पोहोचली. तेथील पोलीस पाटलांना घटनेची हकीकत सांगितली. पोलीस पाटलांनी महिलेला गडचिरोली पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर तिथे तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीस अटक केली नाही, अशी माहिती पीडित महिलेच्या नातेवाईकांनी दिली आहे. सदर वाहनाचा कर्मचारी चंद्रपूर येथील असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
ट्रॅव्हल्समधील कर्मचाऱ्याने केला महिलेचा विनयभंग
By admin | Updated: April 26, 2015 02:00 IST