गावाला पेसातून वगळा : संवर्ग विकास अधिकारी व ग्रामसेवकावर आरोपघोट : चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरातील भाडभिडी येथे ७० टक्के गैरआदिवासींची संख्या आहे. मात्र प्रशासनाने चुकीचे सर्वेक्षण करून भाडभिडीला गावाला पेसा क्षेत्रात समाविष्ठ केले. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेण्यात न आल्याने अखेर मंगळवारी भाडभिडी येथील गैरआदिवासी नागरिकांनी ग्रामपंचायतीला चक्क कुलूप ठोकले. त्यानंतर ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका विषद केली. भाडभिडी गावात ७० टक्के नागरिक गैरआदिवासी असल्याने या गावाला पेसा कायद्यातून वगळण्यात यावे, असा ठराव ग्रामसभेत पारित करण्याचा प्रयत्न सुरू असताना ग्रामसभा तहकूब करण्यात आली. या ग्रामसभेला २०० गैरआदिवासी व १७० आदिवासी नागरिक उपस्थित होते. दरम्यान चामोर्शीचे बीडीओ व ग्रामसेवकांनी राजकीय दबावात येऊन चुकीचा ठराव घेतला, असा आरोपही ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी रवींद्र गव्हारे, संतोष किरमे, बंडू येलमुले, रामदास सातपुते, जनार्धन देऊलमले, अशोक वैरागडे, भैय्या देशमुख, बंडू देशमुख, गुरूदेव गव्हारे, डोणू बुरांडे, संदीप देशमुख, आत्माराम सोनटक्के, बंडू गव्हारे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
भाडभिडी ग्राम पंचायतीला ठोकले कुलूप
By admin | Updated: February 25, 2016 01:21 IST