हिंदू व जैन धर्मात अक्षय तृतीया सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू व जैन धर्माच्या तिथी कॅलेंडरमध्ये हा सण समान तिथीला दर्शविला आहे म्हणून जैन अनुयायी या सणाला विशेष महत्त्व देतात. शहरातील धनिक लोक या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करतात तर ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या काळ्या मातीतून पिकाच्या रूपाने सोने उगवावे म्हणून शुभ मुहूर्तावर आपल्या ढवळ्या-पवळ्या बैलाची जोडी घेऊन वखरणीचा प्रारंभ करतो. हा शुभमुहूर्त व करणी केल्यास घरात धान्याच्या राशी येतात, असा समज आहे.
या सणात पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी ग्रामीण भागात मातीच्या मडक्याचे पूजन केले जाते. वैशाख उन्हातही रानात प्रसन्न वातावरण असते. सारे रान हिरवेकंच दिसते. हा काळ झाडांसाठी सुगीचा असतो. या सणाला आपल्या पूर्वजांना आंब्याचा पणा, शेवया, कुरड्या, पापड यांचा नैवेद्य करून पूर्वजांना तृप्त केले जाते. उन्हाळ्यात महिलांनी घरीच तयार केलेल्या पदार्थांचा पाहुणचार नैवेद्यात दिला जातो.
काही भागात अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी शेतकरी नांगरणी-वखरणीला प्रारंभ करतात.