नागरिकांची मागणी : नवीन डीपी उपलब्ध करून द्या! आरमोरी : तालुक्यातील जोगीसाखरा परिसरात हेटी मोहल्ला व सालमारा नाल्याच्या परिसरात शेतजमीन असलेल्या कृषीधारकांना गतवर्षी महावितरणने दोन ठिकाणी नवीन डीपी लावल्या मात्र यातील एक डीपी १५ दिवसांतच जळाली. तसेच हेटी मोहला परिसरातील डीपी कमी दाबाची असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे सदर दोन्ही ठिकाणी नवीन डीपी बसविण्यात यावी, अशी मागणी जोगीसाखरा परिसरातील नागरिकांनी केली आहे. सदर दोन्ही ठिकाणच्या डीपी बदलविण्यात याव्या, असा ठराव ग्राम पंचायतीने चार महिन्यांपूर्वी घेतला. व सदर ठराव महावितरणच्या कार्यालयाला सादर केला. वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी नवीन डीपी बसविली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. तत्काळ येथे नव्या डीपी बसविण्यात यावी, अशी मागणी मोहन घरत, सोपान गेडाम, रत्ना पेंदाम, दशरथ राऊत, नरेंद्र गजभिये यांनी केली आहे.
कृषी पंपासाठी डीपीचा अभाव
By admin | Updated: January 18, 2017 01:45 IST