नदीघाटांचे दरवर्षी लिलाव होऊन काेट्यवधी रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळताे. सध्या वैनगंगा नदी घाटांचे लिलाव न झाल्याने अवैध रेती चोरीचे प्रमाण वाढले आहे. विनापरवाना वाहतूक करून रेती चोर मालामाल होत आहेत. कोंढाळा गावापासून अगदी काही अंतरावर वैनगंगा नदी आहे. याच संधीचा फायदा काही ट्रॅक्टरधारक व इतर घेत असून, नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा करून रेती विक्री करीत आहेत. अवैध रेतीच्या उपशामुळे नदीपात्र खोलगट बनत आहे. हजारो ब्रास रेतीचा उपसा यापूर्वी व सद्य:स्थितीत सुरूच आहे. ट्रॅक्टरधारकांचे सर्वत्र धागेदोरे व जाळे पसरले असल्याने मोबाइल संपर्काद्वारे सर्वत्र संपर्क करून इकडे-तिकडे हालहवाला घेतला जातो व रेतीचा अवैधरीत्या उपसा केला जातो. रेतीचा अवैधरीत्या उपसा करण्यासाठी रात्री १२ वाजेनंतरचा कालावधी निवडला जाताे. शासन स्तरावरून कितीही कठोर व ठोस पावले उचलली जात असली तरी रेतीचा अवैध उपसा करून चोरीची रेती विकली जातच आहे. लाखो रुपयांचा दंड आकारूनही दंडाला न जुमानता ‘चलती का नाम गाडी’ असे चित्र निर्माण झाले आहे; परंतु शासनस्तरावरून रेती चोरीला आळा घातला जात नसल्याने अवैध व्यावसायिकांचे फावले आहे. महसूल प्रशासनाने याेग्य उपाययाेजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोंढाळा वैनगंगा नदीपात्र अवैध रेती तस्करीचे बनले माहेरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:37 IST