आरमोरी : तालुक्यातील कुकडी, विहीरगाव, कोरेगाव, नरचुली परिसरात दीड महिन्यांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. ग्रामस्थांना उकाड्यापासून बचाव करण्यासाठी पंखे, कुलर तसेच अन्य साधनांची आवश्यकता भासते. परंतु, या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत असल्याने ग्रामस्थांना त्रास हाेत आहे. या परिसरात शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. सध्या विविध याेजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतात. त्यामुळे वीजपुरवठा गरजेचा आहे. शेतीला पाणी देण्यासाठी वीजपुरवठा आवश्यक आहे. परंतु, वीज वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी वेळाेवेळी माेटारपंपाद्वारे शेतीला पाणी देऊ शकत नाहीत. गावातही रात्री अंधारातूनच ये-जा करावी लागते. परंतु, या परिसरातील समस्येकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष हाेत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या भागातील विजेची समस्या साेडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कुकडी-विहीरगाव परिसरात अनियमित वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:40 IST