कारवाई करा : राष्ट्रीय जनहितवादी व अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीची मागणीएटापल्ली : शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेखाली सन २0११-१२ पासून खरेदी केलेल्या धान्याची वाहतूक व भरपाई न केल्याने ३ ते ४ पावसाळ्यापासून करोडो रूपयाचे धान्य भिजल्याने सडण्याच्या मार्गावर आहे. करोडो रूपयांच्या शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जनहितवादी व अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती एटापल्लीच्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर गोडाऊन एटापल्ली शहरातील वस्तीच्या मध्यभागी असल्यामुळे सडलेले धान्य खाल्ल्याने अनेक पाळीव जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. तसेच धान्य सडल्याने दूषित विषारी वायुची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. त्यामुळे मनुष्य व प्राण्यांचा आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. तसेच परिसरातील विहिरी व बोरवेलमधून सडलेल्या धानाचे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. परिसरातील नागरिकांना घरात राहणे अत्यंत धोकादायक ठरत आहेत. पावसाळ्यापूर्वी धानाची विल्हेवाट न लावल्यास आरोग्यास गंभीर धोका होऊ शकतो. जीवित हानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सडलेले धान्य ठिकाणावरून त्वरित उचलावे. सडलेल्या धान्यांची त्वरित उचल न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. भविष्य काळात उद्भवणार्या परिस्थितीला सर्वस्वी शासन जबाबदार राहील. असा इशाराही जनहितवादी समिती व अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने तहसीलदार वैद्य यांना निवेदनातून देण्यात आला. निवेदन देतांना गणेश दुर्गे, राकेश पुंगाटी, सरिता पुंगाटी, सुरेश बारसागडे आदी उपस्थित होते. या प्रश्नावर सातत्याने मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
धान्य सडल्याची चौकशी करा
By admin | Updated: May 30, 2014 00:05 IST