चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज या सिंचन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून नुकतीच या प्रकल्पाच्या कामाला आमदार डॉ. देवराव होळी यांनी भेट दिली व संपूर्ण प्रकल्पाच्या कामाची माहिती जाणून घेतली.या प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र निश्चित झाले असून बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांन्या योग्य न्याय देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे.आघाडी सरकारच्या काळात चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पामुळे ७१ गावातील ११ हजार ५१० हेक्टर सिंचन क्षेत्रावर ओलिताची सोय होणार आहे. बॅरेजच्या पाण्यासाठ्याची क्षमता ६२.५३ दसलक्ष घनमिटर असून चिचडोह बॅरेजच्या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील २८ व गडचिरोली जिल्ह्यातील ४३ अशा ७१ गावातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होणार आहे. ३८ दरवाजे या प्रकल्पाचे राहणार असून प्रकल्पाच्या गेटपासच्या पार्टच्या फेब्रीकेशनचे काम सध्या सुरू आहे. या कामाची आमदार डॉ. देवराव होळी यांनी पाहणी केली. चामोर्शी येथील ६ शेतकऱ्यांच्या भूसंपादनाची कारवाई योग्यरितीने करा, तसेच प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र निश्चित झाले असून अशा शेतकऱ्यांनाही योग्य मोबदला द्या, असे निर्देश पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदारांनी दिले. यावेळी आमदारांसमावेत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, मानिकचंद कोहळे, मान्तेश श्रीरामे, बंडू चलाख, जयराम चलाख, प्रकल्प व्यवस्थापक एम. डी. साधनकर, बोरघाट उपसा सिंचन उपविभागाचे उपअभियंता रोषण हटवार, सुभाष होळबे, उपअभियंता विमोल सहारे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या - देवराव होळी
By admin | Updated: November 29, 2014 01:19 IST