गडचिरोली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून थेट संवाद साधला. या कार्यक्रमाविषयी शहरी व ग्रामीण भागात विद्यार्थी व शिक्षकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्सुकता होती. पंतप्रधानांचे आजचे भाषण हे बालकांना मोटीवेशन करणारे ठरले, अशी प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांमध्ये उमटली आहे. तर भाषणाचा आजचा अनुभव हा आयुष्यातला एक मोठा ठेवा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या निधीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत चालणाऱ्या कस्तुरबा गांधी विद्यालय एटापल्ली येथे पंतप्रधानांचे भाषण दाखविण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. या संदर्भात मुख्याधापिका डी. आर. कुळमेथे यांना विचारणा केली असता, अशी कुठलीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तर भगवंतराव आश्रमशाळा येथेही टीव्ही संचाची व्यवस्था करण्यात आली नव्हती. या संदर्भात मुख्याध्यापक धनंजय पोटदुखे यांनी टीव्ही खराब आहे व केबलची व्यवस्था नाही. त्यामुळे पंतप्रधानांचे भाषण दाखविणार नसल्याचे त्यांनी सांगितले. एटापल्ली तालुक्यात जि.प. शाळा जव्हेली, सोकेवाडा टोला येथे टीव्ही संचाची व्यवस्था नसल्याने गावातील नागरिकांच्या घरी पंतप्रधानांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आले. जिल्ह्याच्या इतर भागात अनेक शाळांनी रेडीओ, टीव्ही यांची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना पंतप्रधानाचे प्रबोधनात्मक भाषण ऐकविले. पहिल्यांदाच शिक्षक दिन एका वेगळ्या पध्दतीने साजरा झाला, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटली आहे. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचे मन जिंकले असाच सूर सर्वत्र आहे.
काश्मीरमध्ये पूरस्थिती गंभीर
By admin | Updated: September 6, 2014 01:51 IST