महावितरणच्या लहरीपणामुळे या परिसरातील रबी हंगामात धानाची लागवड करणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आंदोलनानंतर काही दिवस येथील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात येतो. मात्र, परत १६ तासांचे लोडशेडिंग सुरू करण्यात येत असल्याने या परिसरातील धान पीक करण्याचा धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच आमदार कृष्णा गजबे यांच्यासह शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुरेन्द्रसिंह चंदेल, काँग्रेस नेते जीवन नाट, व्यंकटी नागीलवार यांनी मुंबई येथे पालकमंत्री, ऊर्जामंत्री तसेच महावितरणचे संचालक विजय सिंघल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती. त्यांनी लोडशेडिंगला ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचेही मान्य केले. तरीसुद्धा येथील लोडशेडिंग १६ तास सुरूच असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर धडक दिली.
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष डॉ. महेन्द्रकुमार मोहबंसी, माजी शिवसेना तालुका प्रमुख आशिष काळे, नगरसेवक पुंडलिक देशमुख, गुणवंत कवाडकर, राकेश खुणे, जयदेव खुणे, वासुदेव बहेटवार, पुरुषोत्तम तिरगम, अनिल उईके, जांभूळखेड्याच्या सरपंच राजबत्ती नैताम, उपसरपंच गणपत बन्सोड, दिगांबर नाकाडे, अशोक गायकवाड, जगदीश मानकर व अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
(बॉक्स)
बिल भरल्यास १६ तास पुरवठा
चोख पोलीस बंदोबस्तात उपविभागीय अभियंता मुरकुटे यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी विद्युत बिलाची थकीत रक्कम काही प्रमाणात भरावी, यानंतर दिवसातून किमान १६ तास नियमित विद्युत पुरवठा करण्यात येईल, असे सांगितले.