भामरागड : भामरागड ग्रा. पं. प्रशासन स्वच्छतेचे महत्व नागरिकांना पटवून देत असले तरी येथील मुख्य चौकात घाण पसरली असल्याने ग्रा. पं. प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुका मुख्यालय असलेल्या भामगराड येथील मुख्य चौकाला घाणीचा विळखा आहे. मात्र चौकाची स्वच्छता करण्याकडे ग्रा. पं. प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होण्याची भीती आहे. तालुक्याच्या दुर्गम भागातील नागरिक तालुका मुख्यालयात रोजगारानिमित्य येत आहेत. त्यामुळे भामरागडचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु स्थानिक प्रशासनातर्फे नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. अनेक वार्डांमध्ये नाल्यांची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी घाण पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. अनेक वार्डांमध्ये कचऱ्याचे ढिग साचले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गावातील संपूर्ण नाल्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी ग्रा. पं. प्रशासनाची असते. त्याबरोबरच साथीच्या रोगांविषयी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्यांची होती. मात्र स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सचेत करण्याचे काम केले नाही. गावातील अनेक नाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. डासांमुळे डेंग्यू, हिवताप यासारखे आजार बळावले आहेत. मात्र अनेक कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याने दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळू शकत नाही. (तालुका प्रतिनिधी)
भामरागडला घाणीचा विळखा
By admin | Updated: September 4, 2014 23:48 IST