लाेकमत न्यूज नेटवर्कगडाचीरोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्याचा निश्चय गुरुवारी (दि.९) झालेल्या पक्षाच्या बैठकीत करण्यात आला. विशेष म्हणजे या बैठकीला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांपासून तर तरुण पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण एका मंचावर विराजमान होते. त्यामुळे पक्षाला बळकटी देण्यासाठी एकत्रपणे काम करण्यातच भलाई आहे, असा जणू संदेशच या बैठकीतून त्यांनी दिला आहे.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूर मार्गावरील हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन केले होते. माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, रवींद्र दरेकर, डॉ. नितीन कोडवते, प्रदेश महिला सचिव भावना वानखेडे, बीआरओ अरुण धोटे, घनश्याम फुलचंदाणी, प्रमोद बोरीकर, सोहेल अहमद, अनिक झामा, दामोदर नेवारे, देमेंद्र रहांगडले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.बैठकीला गडचिरोली शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुका अध्यक्ष नेताजी गावतुरे, धानोराचे तालुकाध्यक्ष मनोहर पोरेटी, आरमोरीचे मनोज वनमाळी, देसाईगंजचे परसराम टिकले, कुरखेडाचे जयंत हरडे, कोरचीचे मनोज अग्रवाल, अहेरीचे मुस्ताक हकीम, तसेच प्रभाकर वासेकर, रजनीकांत मोटघरे, पांडुरंग घोटेकर, वामनराव सावसाकडे, देवाजी सोनटक्के यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी निवडणुका व नवसंकल्प अभियानावरही चर्चाया बैठकीत विविध विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात खेळीमेळीच्या वातावरणात आणि लोकशाही पद्धतीने संघटनात्मक निवडणुका पार पाडण्यावर सर्वांनी भर दिला. सोबतच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, तसेच येणाऱ्या दिवसांत जिल्हास्तरीय नवसंकल्प अभियान राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.