रांगी : रांगी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शेतापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांचे मातीकाम तीन ते चार वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील पांदण रस्त्याचे खडीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रांगी परिसरातील अनेक रस्त्यावर चार ते पाच वर्षांपूर्वी मातीकाम करूनही खडीकरण झाले नाही. तसेच बऱ्याच रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला नाही. पावसाळ्यात या मार्गावर चिखल निर्माण होताे. ट्रॅक्टर, बैलबंडी ये-जा करतात. त्यामुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय हाेताे. पावसाळ्यात वाहने व शेतीची उपकरणे नेताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पांदण रस्त्याचे काम झाल्यानंतर मुरुम टाकून रस्ता तयार केला जाईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांना होती. मात्र मुरुम व गिट्टी टाकण्यासाठी निधी मिळत नसल्याने खडीकरणाचे काम पूर्णपणे ठप्प पडले. याचा त्रास रांगीसह परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
पांदण रस्त्यांच्या खडीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:38 IST