चामाेर्शी तालुक्याची लोकसंख्या एक लाख ७९ हजार १२० (२०११च्या जनगणनेनुसार) आहे. तालुक्यात २०४ गावे आहेत. ७५ ग्रामपंचायती व एका नगरपंचायतीचा समावेश आहे. तालुक्यात इयत्ता पहिली ते १२वीपर्यंत एकूण २८० शाळा व महाविद्यालयांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या १९६ व ३ शासकीय आश्रमशाळा असे १९९ व खासगी व्यवस्थापनाच्या ८१ खासगी अनुदानित, विनाअनुदानित, इंग्रजी माध्यमाच्या शाळा-महाविद्यालयांचा समावेश आहे. आज ज्यांची मुले लहान आहेत, ती घरात राहून मोठी होत आहेत; पण बालपण न भोगता शाळेत न जाता वाढलेली ही मुले मोठी होतील तरी कशी? आज शाळेविना कागदोपत्री उत्तीर्ण झालेली ही पिढी जीवनाच्या प्रश्नांची उत्तरे कागदातच शोधू लागली, तर व्यवहाराच्या मैदानात झिरो मिळून त्यांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही का? असा प्रश्न या क्षेत्रातील जाणकारांना पडला आहे.
आज अ, ब, क, ड आणि ए, बी, सी, डी न शिकता थेट पुढच्या वर्गात जाणारे चिमुकले आता आठवीपर्यंत तसेच ढकलत नेले जाणार आहेत. त्यांपैकी पुढे काही मुले अभियंते घडतील, काही डॉक्टर घडतील; तर काही राजकारणात जातील. हे अर्धवट ज्ञानी स्वत:सह साऱ्या समाजाचे नुकसान करतील. कोरोनामुळे तालुक्यातील हजारो मुले नर्सरीत पाऊल न ठेवताही केजी-१ मध्ये दाखल होणार आहेत. हजारो विद्यार्थी केजीमध्ये न जाता थेट पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत. पहिल्या वर्गात जाण्यापूर्वी चिमुकल्यांना शालेय जीवनाची तोंडओळख व्हावी, हा पूर्वप्राथमिक शिक्षणाचा उद्देश आहे. मात्र यंदा कोरोनामुळे शाळा आणि नर्सरीचे वर्ग भरले नाहीत. तिसऱ्या लाटेचा धाेका असल्याने चालू शैक्षणिक सत्र जसे कोरे राहिले; तसेच २०२१-२२ हेही वर्ष शाळेविना राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बॉक्स
कायदा ठरला अडसर
मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना वयानुसार संबंधित वर्गात दाखल करावे लागते. यंदा पहिलीचे विद्यार्थी वर्षभर शाळेत गेले नसले तरी पुढच्या सत्रात दुसऱ्या वर्गात बसविणे आवश्यक आहे. आरटीईच्या तरतुदीनुसार ही बाब अपरिहार्य असली तरी विद्यार्थ्यांना एक अक्षर न शिकविता त्याची प्रगती झाली, असे गृहीत धरणे याेग्य हाेणार नाही. चिमुकल्याचे आज झालेले शैक्षणिक नुकसान कधीच भरून निघणार नाही. त्यांचे आजचे शिकण्याचे वय निघून गेल्यावर पुन्हा त्यांना ‘त्या’ वर्गात शिकण्याची संधी नाही.