चामोर्शी : कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत असताना त्याला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरूच आहे. फेब्रुवारी ते आतापर्यंत जवळपास दोन लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.
शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी संचारबंदी व लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची चार पथके नेमली आहेत. या पथकाने २७ फेब्रुवारी ते ३ मेपर्यंत विनामास्क फिरणाऱ्या ९३९ नागरिकांकडून व १२ दुकानदारांकडून १ लाख ८४ हजार ४५० रुपयाचा दंड वसूल केला आहे.
नगर पंचायत कार्यालय, तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांची ही चार पथके तैनात आहेत. विनामास्क फिरणारे ९३९ वाहनधारक, पादचारी नागरिक व १२ दुकानदार यांच्याकडून हा दंड वसूल केला आहे. तसेच विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्या ४७ नागरिकांकडून ९,४०० रुपयाचा दंड वसूल केला.
पथके दररोज शहरात फिरतात. जिल्हा परिषद केंद्र शाळेजवळ पथक कार्यरत असून शारीरिक अंतर व मास्कचा वापर याकडे लक्ष देऊन आहेत. याच ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर करडी नजर ठेवून तसेच बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचीसुद्धा चौकशी केल्या जात आहे.
तहसीलदार जितेंद्र सिकतोडे, मुख्याधिकारी सतीश चौधरी, पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनात ही पथके कार्यरत आहेत. शनिवार, रविवार दोन दिवस लॉकडाऊन झाल्यानंतर नागरिक कामाचे कारण सांगत सोमवारी दि.३ मे रोजी बाहेर पडले होते. त्यामुळे जिल्हा परिषद केंद्र शाळेजवळील पथकाने त्यांच्याकडून दंड वसूल केला.