आष्टी : शुक्रवारच्या रात्रीपासून शनिवारपर्यंतच्या संततधार पावसामुळे आष्टी परिसरातील चौडमपल्ली नाल्याच्या पुलावर ८ फूट पाणी चढल्याने अहेरी आगाराच्या लांब पल्ल्याच्या १० बसगाड्या तब्बल २२ तास आष्टी येथील येथील बसस्थानक परिसरात अडकून पडल्या होत्या. रविवारी दुपारी ३ वाजता चौडपमल्ली नाल्याच्या पुलावरील पाणी कमी झाल्यानंतर या बसेस अहेरीकडे सोडण्यात आल्या. अहेरी बसस्थानकातून आष्टी, चंद्रपूर मार्गे अमरावती, नागपूर, यवतमाळ या लांब पल्ल्याच्या बसगाड्या सकाळच्या सुमारास सोडण्यात येतात. शनिवारी सकाळच्यास सुमारास पाऊस कमी असल्याने या बसगाड्या नागपूर, अमरावती, यवतमाळकडे सोडण्यात आल्या. मात्र संततधार पाऊस बरसल्याने शनिवारी सायंकाळच्या सुमारास चौडमपल्ली नाल्याच्या पुलावर ८ फूट पाणी चढले. परिणामी यवतमाळ, नागपूर, अमरावती येथून परत येणाऱ्या या बसेस अडकल्या. तब्बल २२ तास लांब पल्ल्याच्या बसेस अडकून पडल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. शनिवारी आष्टी भागातील अनेक मुख्याध्यापक व शिक्षक जि.प. शिक्षण विभागाच्या बैठकीला गेले होते. तसेच काही वनविभागाचे अधिकारीही गडचिरोली तसेच नागपूरकडे गेले होते. पुरामुळे बसेस अडकल्याने अनेक प्रवाशांनी आष्टी येथे मुक्काम ठोकला. तर काही प्रवाशांना चौडमपल्लीच्या नाल्यानजीकच रात्र बसमध्ये काढावी लागल्याची माहिती आहे. संततधार पावसामुळे या परिसरातील अनेक मार्ग बंद झाले आहेत. परिणामी या मार्गावरील बसफेऱ्या रद्द केल्या आहेत. (प्रतिनिधी)
तब्बल २२ तास बसगाड्या अडकल्या
By admin | Updated: September 8, 2014 01:19 IST