गडचिरोली तालुक्यातील कनेरी गावालगतच्या दूध डेअरीजवळ उत्तरप्रदेशातून आलेला धान ट्रकमधून उतरवून तीन ट्रॅक्टरमध्ये भरून पारडी खरेदी केंद्रात विक्रीसाठी नेला जाणार हाेता. या माहितीच्या आधारे कृउबासच्या कर्मचाऱ्यांनी कनेरी गाव गाठून सदर धानाबाबत चौकशी केली असता हे धान उत्तर प्रदेश राज्यातून आले असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यावर २३ हजार ५३५ रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला. तसेच पुढील कारवाईसाठी ट्रक व तीनही ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. ही कारवाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी लक्ष्मण कावळे, जिल्हा खरेदी अधिकारी कोकाटे, गडचिरोली तालुका पुरवठा निरीक्षक यांनी केली.
सदर प्रकरणाची माहिती मिळताच कृउबासचे प्रशासक चंद्रशेखर भडांगे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही संबंधितांवर कठाेर कारवाई करण्याचे निर्देश दिले. एकीकडे शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करताना अडचणी येत आहेत आणि व्यापारी बाहेरच्या राज्यातून धान आणून विक्री करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या आमिषाला बळी न पडता आपला सातबारा त्यांना देऊ नये, असे आवाहन चंद्रशेखर भडांगे यांनी केले आहे.
‘त्या’ शेतकऱ्यांची धाकधूक वाढली
जिल्ह्यात आधारभूत खरेदी याेजनेंतर्गत मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने धान खरेदी केली जात आहे. ह्या केंद्रांवर धान विक्रीसाठी हेलपाटे मारावे लागतात म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मळणीनंतर आपले धान व सातबारा व्यापाऱ्यांना दिला. केंद्रावरील हेलपाटे मारण्याच्या कटकटीतून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न ह्या शेतकऱ्यांचा हाेता. परंतु धान व सातबारा दिलेल्या शेतकऱ्यांना आपल्या धानाची विक्री व्यापाऱ्यांमार्फत झाली की नाही याबाबत शंका वाटत आहे. धान खरेदीची मुदत संपत असल्याने त्यांची धाकधूक आता वाढली आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री न झाल्यास व्यापारी त्यांना आपल्या दरानुसार पैशे देण्याची शक्यताही काही शेतकरी वर्तवित आहेत.