हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना माहे जूनमध्ये हिवताप नियंत्रणासाठी कामाचे आदेश दिले जातात. परंतु मागील दोन-तीन वर्षांत काम मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. जिल्ह्यात एचए, एमपीडब्ल्यू, एएनएम आदी संवर्गाची पदे रिक्त आहेत. हिवताप नियंत्रणासाठी मनुष्यबळाची अधिक मागणी केल्यास हिवताप नियंत्रण चांगले होऊ शकते. सदर कर्मचारी आदेश मिळताच मुख्यालयाच्या ठिकाणी रुजू होतात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी उपस्थित राहून चांगली सेवा देऊ शकतात. त्यासाठी कर्मचाऱ्यांना हिवताप नियंत्रण कामावर घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गीतेश खेवले, सचिव घनश्याम भांडेकर, देवराव सातपुते यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
बाॅक्स
बेराेजगारांना मिळू शकताे राेजगार
जिल्ह्यातील हिवताप रोगाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ती संख्या आटोक्यात आणण्यासाठी २०१६ मध्ये हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून संचालक हिवताप आरोग्य विभाग यांच्या आदेशानुसार भरती करण्यात आली. सदर कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप व इतर कीटकजन्य आजार नियंत्रणात आणण्याचे काम सोपविले. हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना गृहभेटी देणे, रक्त नमुने गोळा करणे, गप्पी मासे सोडणे, डबके व नाल्यातील पाणी वाहते करणे तसेच कीटक नियंत्रणासाठी फवारणी करणे, ही कामे करावी लागत हाेती. जिल्ह्यात हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचा वापर हिवताप नियंत्रणासाठी करून घेतल्यास बेराेजगारांना रोजगार प्राप्त होऊ शकतो.