धरणे आंदोलन : सेवानिवृत्तीचा लाभ देण्याची मागणी; इतर राज्यांप्रमाणे वाढीव मानधन द्यागडचिरोली : मानधनात वाढ करावी, या मुख्य मागणीसाठी जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. त्यानंतर शासनाला निवेदन पाठविण्यात आले. अंगणवाडी सेविकेला पाच हजार रूपये व मदतनिसाला २ हजार ५०० रूपये मासिक मानधन दिले जाते. तेलंगणा व गोव्या राज्यात अंगणवाडी सेविकेला १५ हजार रूपये तर मदतनिसाला सात हजार रूपये मानधन दिले जाते. आंध्रप्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये सुध्दा महाराष्ट्रापेक्षा जास्त मानधन दिले जाते. प्रगत म्हणून स्वत:ला मिरविणाऱ्या महाराष्ट्राला ही शोभनिय बाब नाही. याची खंत शासनाला का वाटत नाही, असा प्रश्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी उपस्थित केला आहे. मनोहर मुळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात एक हजाराहून अधिक अंगणवाडी महिला सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडी सेविकेला सेवानिवृत्तीचा लाभ म्हणून एक लाख रूपये व मदतनिसाला ७५ हजार रूपये देण्याचे मान्य केले होते. शासनाने तसे परिपत्रकही काढले. परंतु तीन वर्षाच्या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात आला नाही. तो तत्काळ देण्यात यावा, अशी मागणी केली. ललिता केदार यांच्या नेतृत्वात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लामतुरे यांना भेटले. थकीत मानधन अहेरी व एटापल्ली प्रकल्पातील मिनी अंगणवाडी सेविकांना वाढीव मानधन देणे, सेवानिवृत्तीचा लाभ देणे, अंगणवाडी सेविका व मदतनिसाच्या रिक्त जागा भरणे आदी मागण्यांबाबत चर्चा केली. या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करू, असे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. धरणे यशस्वीतेसाठी छाया कागदेलवार, माया शेडमाके, सुशिला कार, नागोबाई मडावी, माया नैनुरवार, भारती खोब्रागडे, वंदना कापकर, भागीरथा दुधबावरे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेवर धडक
By admin | Updated: April 4, 2017 00:50 IST