आरमोरी तालुक्यातील वैरागड-वासाळा मार्गादरम्यान असलेल्या चामोर्शी माल येथील श्रीकृष्ण आबाजी बोबाटे (३३ ) व अमीर गणपत जराते (२४) हे दाेघेही रोजगारासाठी दररोज ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा येथे गवंडी कामावर मजूर म्हणून जात होते. श्रीकृष्ण हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. घरी त्याची पत्नी, मुलगा, मुलगी व आई-वडील अर्थात घरचा कर्ता व्यक्ती हाच हाेता. अमीर गणपत जराते हादेखील आपल्या आई-वडिलांना एकटाच हाेता. अविवाहित असला तरी घरातील तरुण व्यक्ती म्हणून त्याच्यावरच कुटुंबाची जबाबदारी होती. हे दोघे सुटी न घेता नित्यनेमाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता दररोज गवंडी कामावर जात; परंतु या दोन्ही होतकरू तरुणांचा अपघाती अंत हाेईल, असे कुणालाही वाटत नव्हते. बुधवार, १० मार्चला हे दोघे कामावरून सुटी झाल्यानंतर वांद्र्यावरून स्वगावी चामोर्शी माल येथे येण्यासाठी निघाले. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बरड (किन्ही) जवळ दोघांचे दुचाकी वाहन विरुद्ध दिशेने येणाऱ्या बैलगाडीवर समोरासमोर धडकले. या अपघातात अमीर जराते हे जागीच ठार झाले, तर श्रीकृष्ण बोबाटे यांनी चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. दोन्ही होतकरू आणि मनमिळाऊ तरुणांच्या दुर्दैवी अपघाती निधनाने चामाेर्शीसह परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.
‘त्या’ दाेघांच्या अपघाती निधनाने कुटुंबांचे छत्र हरपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST