क्रांतीपर्वाची सुरुवात! मालिकेत डॉ. अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले यांची धमाकेदार एन्ट्री होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 17:49 IST2026-04-15T17:44:55+5:302026-04-15T17:49:15+5:30
स्त्रिया आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी टाकलेली धाडसी पावलं, सहन केलेला विरोध आणि संघर्ष हे सगळं आता मालिकेत अधिक प्रभावीपणे मांडलं जाणार आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा साकारण्यासाठी मालिकेत डॉ. अमोल कोल्हे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांची एण्ट्री होणार आहे.

क्रांतीपर्वाची सुरुवात! मालिकेत डॉ. अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले यांची धमाकेदार एन्ट्री होणार
स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरुन प्रतिसाद मिळतोय. सावित्रीबाई आणि जोतीराव यांचं बालपण, त्यांचा विवाह, शिक्षणाविषयीची तळमळ प्रेक्षकांनी मनापासून अनुभवली आहे. आता मालिकेत एका निर्णायक टप्प्याची सुरुवात होणार आहे. समाजातील जातीभेद, अन्याय आणि अंधश्रद्धा यांना छेद देत ‘शिक्षण हेच खरे सामर्थ्य’ हा विचार रुजवण्यासाठी सावित्रीबाई आणि जोतीराव उभे राहणार आहेत.
स्त्रिया आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी टाकलेली धाडसी पावलं, सहन केलेला विरोध आणि संघर्ष हे सगळं आता मालिकेत अधिक प्रभावीपणे मांडलं जाणार आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा साकारण्यासाठी मालिकेत डॉ. अमोल कोल्हे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांची एण्ट्री होणार आहे.
मधुराणी गोखले आपली भावना व्यक्त करताना म्हणाल्या, ‘सावित्रीबाई फुले युगस्त्री होत्या. इतकं आभाळा एवढं व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणं मोठी जबाबदारी आहे. आज आपण मुक्तपणे शिकत आहोत, आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात काम करत आहोत, अभिमानाने मिरवत आहोत. पण त्यासाठी दीडशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने इतका मोठा संघर्ष केला. मला सगळ्यांच्या वतीने सावित्रीबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. उत्सुकता, हुरहूर आणि दडपण अश्या संमिश्र भावना आहेत. प्रेक्षकांनी साथ द्यावी हीच अपेक्षा आहे.’
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ‘कलाकार म्हणून माझं भाग्य आहे की वेगवेगळ्या लार्जर दॅन लाईफ भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. महात्मा जोतीराव फुले यांची व्यक्तिरेखा साकारणं हे एक वेगळं आव्हान आहे. विचारांची धगधगती मशाल म्हणजे महात्मा जोतीराव फुले. व्यवस्थेला प्रश्न विचारायची सुरुवात महात्मा फुलेंनी केली. अश्या क्रांतीकाराचे विचार पोहोचवणं ही मोठी जबाबदारी आहे. या पुढील भागांमध्ये केवळ कथा पुढे सरकणार नाही, तर एक सामाजिक क्रांती कशी आकाराला आली याचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.