'एप्रिल मे ९९' फेम साजिरी जोशीची नवी इनिंग, छोट्या पडद्यावर पदार्पण, करणार सूत्रसंचालन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:42 IST2025-12-11T11:41:08+5:302025-12-11T11:42:01+5:30
Sajiri Joshi : 'एप्रिल मे ९९' सिनेमातून अभिनेत्री साजिरी जोशीने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. यातील तिच्या कामाचं खूप कौतुक झाले. त्यानंतर 'बाई तुझ्यापायी' या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर आता ती छोट्या पडद्यावर पदार्पण करते आहे.

'एप्रिल मे ९९' फेम साजिरी जोशीची नवी इनिंग, छोट्या पडद्यावर पदार्पण, करणार सूत्रसंचालन
'एप्रिल मे ९९' सिनेमातून अभिनेत्री साजिरी जोशीने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. यातील तिच्या कामाचं खूप कौतुक झाले. त्यानंतर बाई तुझ्यापायी या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर आता ती छोट्या पडद्यावर पदार्पण करते आहे. ती स्टार प्रवाहवरील 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' या लोकप्रिय कार्यक्रमात दिसणार आहे. या शोचं सूत्रसंचालन ती करणार आहे.
स्टार प्रवाहवरील 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या तिन्ही पर्वांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या पर्वातील गुणवान स्पर्धकांनी आपल्या प्रतिभेने संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले आहे. केवळ स्पर्धा नव्हे, तर स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देणारा हक्काचा मंच म्हणून या कार्यक्रमाची ओळख आहे. या कार्यक्रमाचा चौथा सीझन सज्ज झाला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे छोटे गायक आपल्या सुमधुर आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत.
''नव्या माध्यमासाठी मी उत्सुक''
या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी नवोदित आणि गुणी अभिनेत्री साजिरी जोशी सांभाळणार आहे. याबद्दल साजिरी म्हणाली, "नवीन माध्यम जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' हा कमाल शो आहे. याआधीची तिन्ही पर्व सुपरहिट ठरली आहेत आणि चौथं पर्व मला होस्ट करायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. सगळेच स्पर्धक कमाल आहेत. त्यांची गाणी ऐकण्यासाठी, त्यांचं स्वप्न जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे."
पुढे ती म्हणाली की, "सचिन पिळगावकर सर, आदर्श शिंदे दादा, वैशाली सामंत ताई इतके दिग्गज समोर असताना मलाही खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. या पर्वाची थीम 'सुरांची स्वप्ननगरी' अशी असणार आहे. स्वप्न सगळ्यांसाठीच महत्त्वाची असतात. जादू अनुभवायला प्रत्येकालाच आवडतं. त्यामुळे या जादुई नगरीची सफर करण्याची एक वेगळी ओढ लागली आहे."