मिलिंद गुणाजींचा अभिनय क्षेत्राला रामराम? चर्चांवर मौन सोडत अभिनेते म्हणाले, "पडद्यावर येण्यासाठी मी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 13:20 IST2026-05-19T13:15:46+5:302026-05-19T13:20:06+5:30
कुठे गायब झाले मिलिंद गुणाजी; अभिनयातून घेतला ब्रेक? म्हणाले- " मध्यंतरी काही काळ... "

मिलिंद गुणाजींचा अभिनय क्षेत्राला रामराम? चर्चांवर मौन सोडत अभिनेते म्हणाले, "पडद्यावर येण्यासाठी मी..."
Milind Gunaji: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या नाणं खणखणीत वाजवणारे अभिनेते म्हणजे मिलिंद गुणाजी (Milind Gunaji). 'देवदास','फरेब','विरासत' अशा कितीतरी बॉलिवूड सिनेमांमध्ये कधी नायक तर कधी खलनायक होत त्यांनी लोकप्रियता मिळवली. त्यामुळेच आज दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. जवळपास ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला असून त्यांनी काही पुस्तकांचं लेखनही केलं आहे. 'भुलभूलैय्या २' या चित्रपटात ते शेवटचे दिसले. त्याशिवाय सोशल मीडियावरही सध्या फारसे सक्रिय नाहीत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वत: मिलिंद गुणाजी यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.
मिलिंद गुणाजी यांनी अलिकडेच 'मित्र म्हणे' ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याना एक प्रश्न विचारला गेला. गेल्या काही वर्षात मिलिंद गुणाजी कुठेच दिसत नाहीत. सोशल मीडियावर देखील सक्रिय नाही. त्यामुळे मिलिंद गुणाजी कुठे गायब झाले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुलाखतीत त्यांना यामागचं कारणही विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देत ते म्हणाले, "मी इकडेच आहे. पण, मध्यंतरी काही काळ माझा आवाज बंद झाला होता.अती बोलण्याचा ज्यांचा व्यवसाय असतो म्हणजे कलाकार, गायक तसेच शिक्षक त्यांना ही समस्या बऱ्याचदा जाणवते. म्हणजे याचा तुमच्या आवाजावर परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या आवाजाची क्वालिटी एकदम खराब होतो."
मग पुढे त्यांनी सांगितलं, "काही लोक या परिस्थितीला स्विकारतात आणि मी देखील तसंच केलं होतं. पण, मला असं जाणवलं की माझा आवाज साथ देत नाही. बराच काळ मी या समस्येचा सामना करत होतो. शेवटी देवाच्या कृपेने हा प्रोब्लेम नेमका काय आहे हे समजलं. आता माझा आवाज पूर्णपणे ठीक आहे. कोविड जेव्हा झाला तेव्हा त्या सुमारास हे सगळं झालं. हे नेमकं कशामुळे झालं मला याबद्दल माहित नाही.पण, अती व्होकल कॉड्सचा वापर यामुळे असं होऊ शकतं, असं माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं."
पडद्यावर येण्यासाठी मी कम्फर्टेबल नव्हतो, कारण...
"कोविडचा काळ ते अगदी आतापर्यंत ती समस्या होती. त्यामुळे पडद्यावर येण्यासाठी मी कम्फर्टेबल नव्हतो. एरवी सुद्धा मी कुठल्या पार्ट्या वगैरेला जात नाही कारण मला फारसं जायला आवडत नाही. पण, जेव्हा कधी अशा कुठल्या पार्ट्या किंवा घरगुती कार्यक्रमांना गेल्यावर सुद्धा मला असं जाणवायला लागलं की मी बोलायला लागलो की माझा आवाजच बाहेर यायचा नाही. त्यामुळे तुम्ही असं कोशात जाता. तसंच काहीसं माझ्यासोबत घडलं होतं." असा खुलासा त्यांनी केला.
मिलिंद गुणाजींच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ते 'श्री बाबा नीब करोरी महाराज' सिनेमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.