"आता भीतीशिवाय जगा..."; ममता बॅनर्जींच्या पराभवानंतर विवेक अग्नीहोत्रींनी व्यक्त केला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 18:32 IST2026-05-05T18:22:34+5:302026-05-05T18:32:21+5:30
बॉलिवूडचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी ममता बॅनर्जींच्या पराभवानंतर आनंद व्यक्त केला आहे.

"आता भीतीशिवाय जगा..."; ममता बॅनर्जींच्या पराभवानंतर विवेक अग्नीहोत्रींनी व्यक्त केला आनंद
संपूर्ण भारताचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालचा निकाल सोमवारी (४ मे) जाहीर झाला. भारतीय जनता पक्षाने (भाजप) २९४ पैकी २०६ जागा जिंकून सरकार स्थापन करण्याची तयारी केली आहे. तर १५ वर्षे सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) अवघ्या ८० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या निकालावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले बॉलिवूडचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी ममता बॅनर्जींच्या पराभवानंतर आनंद व्यक्त केला आहे.
विवेक अग्नीहोत्री यांनी पोस्ट शेअर करत बंगालमधील जनतेचे अभिनंदन केले. त्यानं लिहलं, "ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, ममता बॅनर्जी यांनी 'द कश्मीर फाइल्स' प्रदर्शित झाल्यानंतर मला पश्चिम बंगालमध्ये 'बॅन' केलं. चित्रपट थिएटरमधून काढून टाकण्यात आला आणि मला बंगालमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असंही सांगण्यात आलं. गेल्या वर्षी त्यांनी 'द बंगाल फाइल्स' वर पूर्णपणे बंदी घातली. आमच्या ट्रेलर लॉन्चलाही अडथळे आणले गेले. आमच्यावर हल्ले झाले, अनेक FIR दाखल करण्यात आले. राज्यपालांकडून मिळणारा पुरस्कार घ्यायलाही मी जाऊ शकलो नाही".
पुढे ते म्हणाले. "पण,आम्ही हार मानली नाही. निवडणुकीदरम्यान आम्ही 'द बंगाल फाइल्स' शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवला.आम्ही आमच्या पद्धतीने लढलो आणि शेवटी... ही अभूतपूर्व विजयाची नोंद झाली. पश्चिम बंगालच्या जनतेचं अभिनंदन. आता तुम्ही भीतीशिवाय, डोकं उंच ठेवून चालू शकता".