मिशन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचे - आमिर खान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2017 07:14 AM2017-03-15T07:14:24+5:302017-03-16T10:37:16+5:30

आपल्या अभिनयाने मिस्टर परर्फेक्शनिस्ट आमिर खानने गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनयाच्या या सुपरस्टारनं सामाजिक बांधिलकीसुद्धा ...

Mission Maharashtra to be free from drought - Aamir Khan | मिशन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचे - आमिर खान

मिशन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचे - आमिर खान

googlenewsNext
ong>आपल्या अभिनयाने मिस्टर परर्फेक्शनिस्ट आमिर खानने गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनयाच्या या सुपरस्टारनं सामाजिक बांधिलकीसुद्धा जपली आहे. रुपेरी पडद्यावर विविध सिनेमातून त्यानं सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाच आहे.आता रियल लाइफमध्येसुद्धा आमिरची सामाजिक बांधिलकी पाहायला मिळत आहे. आधी 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमिरनं विविध प्रथा आणि परंपरा याविरोधात आवाज उठवला.आमिरच्या व्यक्तीमत्त्वाचा हा रियल पैलू रसिकांच्या काळजाला चांगलाच भिडला. आमिर एवढ्यावरच थांबलेला नाही. त्याने गेल्या वर्षीपासून महाराष्ट्राच्या भीषण पाणी समस्येवर तोडगा काढण्याचं मिशन हाती घेतले आहे. महाराष्ट्राला दुष्काळाच्या दुष्टचक्रातून सोडवण्याचा निर्धार आमिर खान आणि पानी फाऊंडेशननं केला आहे.याच आपल्या मिशनसाठी आमिर खानने नुकतेच 'चला हवा येऊ द्या' शोमध्ये हजेरी लावली.यावेळी आमिरचं मिशन, त्याच्या आगामी योजना आणि सिनेमा याविषयी साधलेला हा खास संवाद.
 
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने एक मिशन हाती घेतलं आहे, ते अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी एक उपक्रम राबवला जाणार आहे, त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल?

'पानी फाऊंडेशन'च्या माध्यमातून महाराष्ट्रातील पाणी समस्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने आम्ही एक मिशन हाती घेतलं आहे. या फाऊंडेशनमध्ये 'सत्यमेव जयते'च्या कोअर टीमचा समावेश आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील दुष्काळ,पाण्याची समस्या लक्षात घेऊन आम्ही 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धा सुरु केली.गावागावात जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या गावात निर्माण केलेली चुरस म्हणजे वॉटर कप स्पर्धा. पहिल्या वर्षी या स्पर्धेत 3 तालुक्यांचा समावेश आम्ही केला होता. मात्र यंदा आमचं ध्येयं मोठं आहे.त्यामुळं यंदाच्या स्पर्धेसाठी आम्ही 30 तालुक्यांची निवड केली आहे.या स्पर्धेचा कालावधी 8 एप्रिलपासून ते 22 मे 2017 असा असेल. यासाठी आम्ही दहा हजार लोकांना प्रशिक्षण दिलं असून ते ग्रामस्थांना प्रशिक्षण देतील.गेल्या वर्षी या स्पर्धेच्या काळात आम्ही एक कार्यक्रम सुरु केला होता.मात्र तो कार्यक्रम त्यावेळी फक्त एका चॅनलवर सुरु होता.यंदा मात्र त्यात थोडा बदल केला आहे.पाण्याची समस्या ही सा-यांसाठी सारखी आहे. पाणी नसल्याने त्रास सगळ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे याबाबत अधिकाअधिक लोकांपर्यंत एकाच वेळी पोहचण्यासाठी यंदा आम्ही एक वेगळा उपक्रम हाती घेणार आहोत.यंदा आम्ही जो कार्यक्रम करणार आहोत तो एकाच चॅनलवर प्रसारीत न होता सर्व मराठी चॅनलवर एकाच वेळी प्रसारीत करणार आहोत. जेणेकरुन सर्वदूर महाराष्ट्रात आमचा संदेश आणि आमची ही स्पर्धा पोहचेल.त्यामुळे एकाच वेळी, एकाच तारखेला हा शो प्रसारीत करण्यात येईल. 8 एप्रिलपासून दर शनिवारी रात्री आणि त्याचे पुनःप्रक्षेपण रविवारी सकाळी करण्यात येईल.


पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून कशाप्रकारे काम सुरु असते? 

पानी फाऊंडेशनचं काम ठराविक वेळेपुरतं मर्यादित नाही.यावर आमचे वर्षभर काम सुरु असतं. आमची कोर टीम 20 जणांची आहे. त्यानंतर दोन वेगवेगळे तालुका कॉऑरिडिनेटर असतात.त्यांच्या माध्यमातून हे काम सुरु असतं.या अंतर्गत आम्ही एक ट्रेनिंग कार्यक्रम बनवतो.त्यानुसार लोकांना ट्रेन करतो. यंदा आम्ही दहा हजार जणांना ट्रेनिंग दिलं आहे.त्यानंतर गावांना आम्ही एक महिना देतो.या काळात वॉटर कप स्पर्धेसाठी अर्ज करण्यासाठी आम्ही त्यांना वेळ देतो.गावांनी अर्ज केल्यानंतर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ग्रामपंचायतीने निवडलेल्या पाच गावक-यांना प्रशिक्षण दिलं जातं.एप्रिल आणि मे हा वॉटर कप स्पर्धेचा कालावधी असतो.त्या कालावधीत मिळालेल्या प्रशिक्षणानुसार गावक-यांनी गावात जलसंधारणाची कामं करायची असतात.पाणलोटच्या विकासासाठी काम करायचं असतं.मे महिन्यात गावाच्या प्रगतीचे सादरीकरण करावं लागतं.त्यानंतर जून-जुलैमध्ये स्पर्धेचे परीक्षक तपासणी करुन त्यांना गुण देतात.जुलै-ऑगस्ट या कालावधीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या गावांना भेटी दिल्या जातात आणि निकाल जाहीर करुन वॉटर कपचे विजेते जाहीर केले जातात.सप्टेंबर महिन्यात पुढच्या कामांना लगेच सुरुवात होते.लोकांना आम्हाला काहीही शिकवायचं नाही. त्यांचं फक्त प्रबोधन करायचं आहे. आपल्या समस्येचं उत्तर आपणच शोधू शकतो याची जाणीव त्यांना करुन द्यायची आहे.आम्हाला आम्ही हे केलं ते केलं दाखवायचं नाही. आम्हाला फक्त या उपक्रमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसांपर्यंत पोहचायचं आहे.लोकांनी ठरवलं तर कोणत्याही समस्येवर तोडगा निघू शकतो. फक्त ती गोष्ट त्यांनी मनावर घेणं गरजेचं आहे. हीच गोष्ट सांगण्याचा माझा आणि पानी फाऊंडेशनचा प्रयत्न आहे.आमचं लक्ष्य आहे ते महाराष्ट्राच्या 86 हजार गावांपर्यंत पोहचून पाणी समस्येवर तोडगा काढण्याचं आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम बनवण्याचं.


सध्या टेकटॉक विषयी भरपूर चर्चा असते.बरेच सेलिब्रिटी ते करतात. किंग खान शाहरुखही ते करतो.तुला कधी करायला आवडेल का?
 

टेकटॉकमध्ये मला फारसा रस नाही. कारण मला कोणी प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं मी सहज देऊ शकतो.मात्र टेकटॉकमध्ये तसं काही नसतं. तुम्हाला 15 ते 20 मिनिटे स्वतःहून बोलायचं असतं. मर्यादित वेळेत उगाच एकटंच बडबड करण्यात मला बिल्कुल रस नाही.
 

तू इतके चांगले मराठी बोलतोस,बॉलिवूडप्रमाणेच रसिकांना तुला मराठी सिनेमातही पाहायचे आहे?तुला मराठी सिनेमात पाहण्याची रसिकांची इच्छा कधी पूर्ण होणार ?  
 
मी मराठीमधून संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या मराठी बोलण्याला मी 200 गुण देईल.. मात्र हा गंमतीचा भाग असला तरी माझं मराठी काही इतकं छान नाही.  मी चांगला विद्यार्थी नाही असं मला वाटतं. जे काही मी बोलतो ते माझ्या गुरुंचं श्रेय आहे. कॅमे-यासमोर जर कुणी माझ्याशी मराठीत बोलत असेन तर मी त्यांना मराठीत उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यावेळी पटकन काही शब्द आठवत नाही. त्यामुळे अडखळ अडखळत मराठी बोलत माझ्या बोलण्याचा ट्रॅक आपोआप हिंदीवर जातो. भाषांमध्ये मी थोडा कच्चा आहे असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. तरीही परफेक्ट मराठी बोलण्यासाठी आणखी 3-4 किंवा 5 वर्ष तरी लागतील. जेव्हा उत्तर मराठी बोलेन त्याचवेळी मराठी सिनेमात काम करेन.
 
तुझ्या आगामी सिनेमाविषयी जाणून घ्यायला आवडेल?

आधी महिलांच्या विषयावर आधारित 'दंगल' हा सिनेमा केला.'सिक्रेट सुपरस्टार' हा माझा सिनेमाही महिलांवरच आधारित असणार आहे.एका वेळी मी एकाच  प्रोजेक्टवर काम करायला आवडते. 'दंगल' सिनेमा करत होतो त्यावेळी फक्त आणि फक्त 'दंगल' सिनेमावर काम करत होतो. त्यानंतर पानी फाऊंडेशनचं काम सुरु झालं. त्यात लक्ष घातलं.आता जूनमध्ये 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळणार आहे त्यांची एक्साईटमेंट आहे.

Web Title: Mission Maharashtra to be free from drought - Aamir Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.