प्रेमासाठी बदलला धर्म, सासरच्यांसाठी सिनेमांपासूनही दूर झाली, पण...; बॉलिवूड अभिनेत्रीचं घटस्फोटावर भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 11:48 IST2026-05-15T11:43:30+5:302026-05-15T11:48:37+5:30
आंतरधर्मीय लग्न, पदरी २ मुलं अन् घटस्फोट झाला, 'त्या' निर्णयाबद्दल अभिनेत्री मनमोकळेपणाने बोलली

प्रेमासाठी बदलला धर्म, सासरच्यांसाठी सिनेमांपासूनही दूर झाली, पण...; बॉलिवूड अभिनेत्रीचं घटस्फोटावर भाष्य
Pooja Bedi: 'जो जिता वही सिकंदर', 'विषकन्या' सारख्या चित्रपटातून लोकप्रियतेच शिखर गाठलेली अभिनेत्री म्हणजे पूजा बेदी. ९० च्या दशकात आपला अभिनय आणि लूकमुळे पूजा अल्पावधीतच स्टार झाली. मात्र, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तिने लग्न करून इंडस्ट्री सोडली. अलिकडेच अभिनेत्रीने तिचं लग्न, घटस्फोट आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.
अभिनेत्री पूजा बेदीने फरहान फर्निचरवाला यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं झाली, पण नऊ वर्षांच्या संसारानंतर २००३ मध्ये ते वेगळे झाले. घटस्फोट हा पूजाच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळांपैकी एक होता. याबद्दल अभिनेत्री म्हणाली, मी एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलं. पण, त्याकाळी हिंदू-मुस्लिम वाद नव्हता आणि समाज अधिक धर्मनिरपेक्ष विचारांवर चालणारा होता.जोस अलुकास यांना दिलेल्या एका मुलाखतीत तिने लग्नानंतर अभिनयातून ब्रेक घेतल्याचं कारणंही सांगितलं ती म्हणाली, तिचे सासरचे लोक खूप पारंपरिक विचारांचे होते. जर तिने चित्रपटांमध्ये काम करणं सुरू ठेवलं असतं तर त्यांना ते पटलं नसतं. त्यामुळे तिने अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही नाकारल्या, असा खुलासा अभिनेत्रीने केला.
लग्नानंतर पूजाने पत्नी आणि सून म्हणून आयुष्य जगायचं ठरवलं.या मुलाखतीत लग्नाबद्दल पूजा म्हणाली, लग्न करणं ही माझी चूक नव्हती. तो एक खास अनुभव आणि प्रवास होता. मी माझ्या माजी पतीची आभारी आहे कारण त्याने मला माझी दोन सुंदर मुले दिली. तो आजही माझा चांगला मित्र आहे.
लग्नाच्या १२ वर्षांनंतर घेतला घटस्फोट...
लग्नाच्या १२ वर्षांनंतर पूजा आणि फरहानने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांची मुलगी ५ वर्षांची आणि मुलगा २ वर्षांचा होता. त्या निर्णयाबद्दल सांगताना ती म्हणाली, "माझं लग्न २४ व्या वर्षी झालं आणि ३२ व्या वर्षी घटस्फोट घेतला. मी लग्नात आनंदी होते आणि घटस्फोटानंतरही आनंदी होते.जेव्हा नात्यातील आनंद संपतो, तेव्हा पुढे जाणंच उत्तम असतं. काही वर्षे चांगली गेली म्हणून उर्वरित आयुष्य दुःखात घालवणं हे गरजेचं नाही." असं मत अभिनेत्रीने व्यक्त केलं.