शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांच्या शास्त्रात AI उलथापालथ घडवेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 08:20 IST

कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून जुन्या निवडणूक शास्त्राला नव्या युक्त्या, बऱ्यावाईट क्लृप्त्यांची जोड कशी मिळते हे उलगडणाऱ्या लेखमालेचा प्रारंभ !

विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयांचे अभ्यासक

‘इलेक्शन इज दी मदर ऑफ ऑल पॉलिटिक्स’ असे म्हटले जाते.  हे तंतोतंत खरे नाही. पण, लोकशाहीतील राजकारणात निवडणुकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते, एवढे मात्र  खरे. राजकीय घटना, घडामोडी आणि प्रक्रिया निवडणुकीच्या पोटी जन्माला येतात. हा तर्क पुढे न्यायचा तर मग निवडणूक कोणाच्या पोटी जन्माला येते, असाही प्रश्न येतो. त्याचे उत्तर नेमके आहे. लोकसंवाद आणि आकडेवारीचे गणित हे निवडणूक नावाच्या प्रक्रियेचे खरे मायबाप. निवडणुकांतील जय-पराजय जनमताच्या ठोस आकडेवारीवर अवलंबून असतो. आणि जनमत अवलंबून असते प्रभावी लोकसंवादावर. आकडेवारीचे गणित आणि लोकसंवादाचा प्रभाव या गोष्टी वरकरणी सोप्या वाटल्या तरी अंमलबजावणीसाठी मात्र महाकठीण असतात.

आकडेवारीच्या गणितात  मतदारांची संख्या, मतदानाची टक्केवारी इतकेच समजून भागत नाही. मतदारांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीचाही अंदाज घ्यावा लागतो.  त्यांचा कल कसा राहू शकतो याचेही गणिती आडाखे बांधावे लागतात. मतविभाजनाच्या फायद्या-तोट्याची समीकरणेही सोडवावी लागतात. मतदारांच्या बेरजा-वजाबाक्यांसोबतच निवडणुकीशी संबंधित अनेक घटकांचे गणिती कलन म्हणजे इंटिग्रेशन करावे लागते. एकुणात निवडणुका  संभाव्यतांच्या संख्याशास्त्राचा एक गुंतागुंतीचा आविष्कार असतात. प्रभावी लोकसंवादातील गुंतागुंत तर याहूनही जास्त. काय सांगायचे, कोणाला सांगायचे, कसे सांगायचे, किती आणि केव्हा सांगायचे अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरे तर शोधावीच लागतात. पण, विरोधकांच्या सांगण्याचा प्रतिवाद कसा करायचा, लोकांच्या प्रतिक्रियांचे अर्थ कसे लावायचे याचीही उत्तरे शोधावी लागतात.

प्रत्यक्ष भेटीगाठीतून, सभा-बैठकांमधून होणाऱ्या लोकसंवादाला तर महत्त्व असतेच. पण, पारंपरिक प्रसारमाध्यमांमधून, नवनव्या डिजिटल माध्यमांमधून होणाऱ्या लोकसंवादाचेही तितकेच, कदाचित त्याहीपेक्षा जास्त महत्त्व असते. काही गोष्टी सरधोपटपणे सगळ्यांपर्यंत, तर काही गोष्टी मतदारांच्या नेमक्या गटांपर्यंत  सतत पोहोचत राहण्याची काळजी घ्यावी लागते. फक्त संवादाचे कौशल्य असून भागत नाही. लोकांच्या मानसशास्त्राचा, त्यांच्या भय आणि आशा-आकांक्षांचाही अभ्यास असावा लागतो. प्रचार मोहीम ही एक गतिमान व्यूहरचना बनवावी लागते.

निवडणुका हा पैशांचा, संपत्तीचा, दंडशक्तीचा वगैरे खेळ असतो हे खरेच. पण, त्यापेक्षाही कितीतरी पटीने निवडणुका म्हणजे लोकसंवादाची आणि मतगणितांची व्यावहारिक पातळीवर केलेली गतिमान व्यूहरचना असते. राजकारण, समाज, लोकमानस, इतिहास यांचे आकलन आणि पूर्वानुभव हा या व्यूहरचनेचा आधार असतो. विदा (डेटा), माध्यमे, कल्पकता, सजगता ही या व्यूहरचनेची साधनसामग्री असते. समज, नियोजन, कष्ट, नावीन्य, चतुराई, चलाखी, लबाडी, प्रसंगी फसवणूक अशा अनेक घटकांमधून ही व्यूहरचना आकाराला येत असते. ही व्यूहरचना यशस्वी झाली की नाही हे मात्र निवडणूक निकालांच्या आधारावर ठरविता येते. म्हणूनच निवडणुका हे शास्त्रही असते.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यासारखे ते आखीव-रेखीव शास्त्र नसेलही. पण, समूहांच्या राजकीय निवडी-नकारांचा अर्थ लावणारे राज्यशास्त्र, शक्य-अशक्यतांचा पट मांडणारे संख्याशास्त्र, प्रभावी संवादाची सूत्रे सांगणारे संज्ञापनशास्त्र, मानवी वर्तन समजू पाहणारे मानसशास्त्र आणि सामूहिक कार्याचे नियोजन शिकविणारे व्यवस्थापनशास्त्र यांच्या सरमिसळीतून निवडणुकीचे उपयोजित शास्त्र आकाराला येते.

एकदा शास्त्र म्हटले की, त्यातून तंत्र जन्माला येणार आणि तंत्रज्ञानही (प्रत्यक्षात हा प्रवास बरेचदा उलटाही असतो). शास्त्र जसजसे गुंतागुंतीचे होत जाईल तसा तंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा वापरही वाढत जाणार. निवडणुकांचे शास्त्रही त्याला अपवाद नाही. पूर्वीही असा वापर व्हायचा. निवडणुका जशा गुंतागुंतीच्या होऊन व्यावसायिकतेकडे झुकायला लागल्या तसतसा तंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा वापरही वाढायला लागला. जगभराप्रमाणेच आपल्याकडेही हे घडते आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्र आणि तंत्रज्ञानही या निवडणूक शास्त्राच्या कामाला जुंपले जातेय.

निवडणूक शास्त्रातील काही खोलवरच्या आव्हानांवर उत्तरे, युक्त्या आणि बऱ्या-वाईट क्लृप्त्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मूळ क्षमतेत सापडतात. विदेच्या साठ्यातून खोलवरच्या वृत्ती प्रवृत्ती शोधणे यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा हातखंडा. निवडणुका म्हणजे तर विदेचा अखंड प्रवाह. एखाद्या निर्णयासाठी प्रतिमान (मॉडेल्स) मांडणे, त्यावरून परिणामांची भाकिते करणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे बलस्थान. निवडणुका म्हणजे तर भाकितांचा खेळ. दिलेल्या विदेच्या शैलीनुसार वेगाने आणि घाऊक प्रमाणावर मायावी आशय निर्माण करणे, संवाद साधणे ही कृत्रिम बुद्धीची नवी सर्जनशीलता. निवडणुका म्हणजे तर घाऊक संवाद व्यवहार. त्यामुळे निवडणुका आणि एकूणच राजकारण यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आणि अपील फार खोलवरचे आहे. त्याची थोडीफार चुणूक याआधीही दिसली आहे. पण, भारतासह जगभरातील अनेक देश यावर्षी निवडणुकांना सामोरे जात असताना या शास्त्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्र आणि तंत्रज्ञानाचा कसा प्रभाव पडेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही छोटी लेखमालिका या शास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या एकत्र येण्याने होणाऱ्या बऱ्या-वाईट शक्यतांचा आढावा घेणार आहे. ते आवश्यक आहे. कारण शेवटी शास्त्र असतं ते.vishramdhole@gmail.com

टॅग्स :Electionनिवडणूक