शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
4
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
5
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
6
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
7
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
8
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
9
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
10
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
11
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
12
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
13
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
14
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
15
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
16
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
17
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
18
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
19
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
20
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

सरताज यांनी स्वत:चे नाव सार्थ ठरविले!

By admin | Updated: March 14, 2017 04:45 IST

मध्य प्रदेशात शाडापूर येथे एका रेल्वेगाडीत बॉम्बस्फोट होतो. थोड्याच वेळात त्याच्या तपासाचे धागेदोरे उत्तर प्रदेशात लखनऊपर्यंत पोहोचतात. तेथील एका घरात लपलेल्या सैफुल्ला नावाच्या

विजय दर्डा, - लोकमत समुहाचे चेहरमनमध्य प्रदेशात शाडापूर येथे एका रेल्वेगाडीत बॉम्बस्फोट होतो. थोड्याच वेळात त्याच्या तपासाचे धागेदोरे उत्तर प्रदेशात लखनऊपर्यंत पोहोचतात. तेथील एका घरात लपलेल्या सैफुल्ला नावाच्या एका दहशतवाद्याचा या बॉम्बस्फोटाशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलीस त्या घराभोवती वेढा घालतात. नंतर हा सैफुल्ला चकमकीत मारला जातो. पोलीस त्याचा मृतदेह सुपूर्द करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधतात. परंतु त्या तरुणाचे वडील मोहम्मद सरताज आपल्या मुलाचे शव स्वीकारायला नकार देतात. जो देशाचा होऊ शकला नाही, तो माझा मुलगा नाही, असे ते सांगतात.दहशतवादी कृत्य केले म्हणून वडिलांनी मुलाचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याचे याआधी अन्य उदाहरण घडल्याचे माझ्या तरी स्मरणात नाही. एकीकडे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांना वाचविण्यासाठी लोक रस्त्यावर येऊन सुरक्षा दलांवर दगडफेक करत असताना मोहम्मद सरताज यांनी दिलेला हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. आपल्या पोटच्या मुलापेक्षा देशाला मोठे मानणारी ही घटना मानवी भावनांची महत्ता सांगते. सरताज आणि सैफुल्ला यांची कहाणी मोठी मार्मिक आहे. मोहम्मद सरताज यांचे त्यांच्या मुलावर प्रेम नव्हते, असा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही. प्रत्येक पित्याप्रमाणे सरताज यांचेही त्यांच्या मुलावर खूप प्रेम होते. याच प्रेमापोटी त्यांनी सैफुल्ला याला योग्य मार्गावर आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्नही केले. आपला मुलगा दहशतवादी बनावा ही गोष्ट कोणत्याही पित्यासाठी किती क्लेषदायक असेल याचा जरा विचार करा. जगात देशद्रोहाहून अधिक कोणताही गुन्हा मोठा असू शकत नाही. सैफुल्लाने तोच अपराध केला होता. अशा परिस्थितीत मोहम्मद सरताज यांनी घेतलेला निर्णय कोणालाही गर्व वाटावा असाच आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही लोकसभेत नेमकी हीच भावना व्यक्त केली व सरताज यांच्या निर्णयाचा संपूर्ण सभागृहास अभिमान वाटतो, असे सांगितले. माझ्या मते सरताज हे खरंच मुकुटमणी ठरले आहेत. सरताज यांच्या निर्णयाने केवळ अल्पसंख्यच नव्हे, तर बहुसंख्याक समाजालाही आपला दृष्टिकोन बदलण्यास नक्कीच भाग पडेल. काही वक्तव्ये आपल्या नेहमी कानावर पडत असतात. प्रत्येक मुसलमान दहशतवादी नसतो, हे त्यापैकीच एक. हे खरेही आहे. एखाद्या समाजातील मूठभर लोकांनी काही दुष्कृत्ये केली तर त्यावरून आपण त्या संपूर्ण समाजास त्याच नजरेतून कसे पाहू शकू? या उलट काही लोकांचा प्रश्न असतो की, प्रत्येक दहशतवादी हा मुसलमानच कसा असतो? असे तर्क-वितर्क इतर बाबतीतही लावता येतील. पण बहुसंख्याक समाजाचा एक मोठा वर्ग मुसलमानांकडे शंकेने पाहतो, ही वस्तुस्थिती आहे. सरताज यांच्या भूमिकेने यात काही बदल व्हावा, अशी अपेक्षा ठेवू या. पण मुळात बहुसंख्याक समाजाचा असा दृष्टिकोन का तयार झाला, असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो. माझ्या मते यात राजकीय नेते व धार्मिक कट्टरपंथींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उत्तर प्रदेशच्या ताज्या निवडणुकीच्या प्रचारात मतांसाठी मंदिर-मशीद व स्मशान-कब्रस्तान अशा विषयांची मदत घेण्याचे जे पाप सध्याच्या राजकारणात केले जात आहे त्याची मोठी किंमत देशाला भविष्यात चुकवावी लागणार आहे.काही झाले की आपण पाकिस्तानला दूषण देऊन मोकळे होतो. पण आपल्या देशात दुसरा एखादा देश एवढे घट्ट पाय कसे रोवू शकतो याचे आश्चर्य वाटते. देशातील युवकांची डोकी अशी कशी भडकू शकतात? हा गंभीर प्रश्न असून, त्यावर राजकारणी नेत्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाहिला तर त्यात हिंदूंच्या बरोबरीने मुसलमानांनी देशासाठी खस्ता खाल्ल्याचे दिसेल. काकोरीकांडाचे सूत्रधार अश्फाक उल्ला खान, वायव्य सरहद्द प्रांतात ब्रिटिशांविरुद्धच्या अहिंसक लढ्याचे नेतृत्व केलेले व सरहद्द गांधी म्हणून ओळखले गेलेले खान अब्दुल गफ्फार खान, भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांचे वकील आसफ अली, गदर पार्टीच्या संस्थापकांपैकी एक अब्दुल हाफीज मोहम्मद बरकतुल्ला, बिहारमधील खिलाफत चळवळीचे, सविनय कायदेभंगाचे नेतृत्व केलेले सय्यद हसन इमाम आणि काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष बद्रुद्दीन तैयबजी यांना आपण कसे विसरू शकतो? स्वातंत्र्यलढ्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक घरातून एक मूठ धान्य गोळा करण्याचे ‘मुठिया आंदोलन’ गफूर अहमद अजाजी या मुस्लिमानेच चालविले होते. आजच्या तरुण पिढीला कदाचित माहीत नसेल की, १८५७ च्या समरात बख्ती खान रोहिला यांनी ब्रिटिशांकडून दिल्ली जिंकून घेतली होती. जून ते सप्टेंबर १८५७ या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली क्रांतिकारकांच्या ताब्यात होती. या क्रांतिकारकांमध्ये हिंदू होते, मुसलमान होते, शीख होते व ख्रिश्चनही होते. रफी अहमद किदवई, बेगम हजरत महल, सैफुद्दीन किचलू, मौलाना मजहरूल हक यांची कामगिरीही विसरता येणार नाही. धर्मगुरू मौलाना अब्दुल अजीज यांचे शिष्य सय्यद अहमद शहीद यांनी इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी अफगाणिस्तानात जाऊन भारताचे निर्वासित सरकार स्थापन केले होते. मौलाना मेहमूद हसन ऊर्फ शैखुल हिंद यांनी इंग्रजांविरुद्ध ‘रेशमी रुमाल’ आंदोलन चालविले होते. त्यांनी भारतात इंग्रजांविरुद्ध उठाव करण्यासाठी तुर्कस्तानच्या खलिफांचीही मदत मागितली होती. त्यांना इंग्रजांनी शिक्षा म्हणून माल्टा बेटावर पाठवून दिले. शिक्षा भोगून ते भारतात परत आले तेव्हा मुंबईत त्यांच्या स्वागतासाठी स्वत: महात्मा गांधी हजर राहिले होते. ही नामावली केवळ वानगीदाखल आहे. भारतीय गुप्तहेर संस्थांमध्ये हजारोंच्या संख्येने मुसलमान काम करतात, हे किती जणांना माहीत आहे? यापैकी कोणाच्याही देशभक्तीबद्दल शंका घेता येऊ शकत नाही. एपीजे अब्दुल कलाम यांची आपण मुस्लीम व हिंदू अशी वाटणी करू शकतो का? नक्कीच नाही. आपली दृष्टी बदलण्याची गरज आहे . मुस्लीम समाजाच्या धुरिणांनाही यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. टाळी दोन्ही हातांनी वाजत असते.हे लिखाण संपविण्यापूर्वी...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा कमालीचा आहे हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाले. मोदींचे करिश्माई नेतृत्व आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची कुशल रणनीती यामुळे भाजपा उत्तर प्रदेशात अजिंक्य ठरली. देवबंद आणि मुस्लीम बहुसंख्य असलेल्या अन्य भागांमध्येही भाजपाला मिळालेला विजय हेच दाखवितो की यावेळी तेथील मतदारांनी जात व धर्म यांच्या पलीकडे जाऊन या पक्षावर विश्वास टाकला. या मोठ्या विजयाने मोदी यांची जबाबदारीही वाढली आहे. पंजाबमधील विजय आणि गोवा व मणिपूरमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरल्याबद्दल काँग्रेस नेतृत्वाचे अभिनंदन. परंतु त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.