शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषेची दुर्दशा मराठी भाषकच करतो

By admin | Updated: February 26, 2017 23:29 IST

यंदाचा ‘विंदा करंदीकर पुरस्कार’ तर व्याकरणतज्ञ यास्मिन शेख यांना ‘डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार’ प्रदान केला जाईल.

आज मराठी राजभाषा दिन. त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबईत एका विशेष समारंभात ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांना यंदाचा ‘विंदा करंदीकर पुरस्कार’ तर व्याकरणतज्ञ यास्मिन शेख यांना ‘डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार’ प्रदान केला जाईल. त्यानिमित्ताने या दोन सारस्वतांची भेट!'अमृतातेही पैजा जिंके' असं आपल्या मराठी भाषेविषयी म्हटलं गेलं आहे. ब्रिटिशांच्या आक्रमणानंतर मराठी भाषेवर इंग्रजीचे अतिक्रमण सुरू झाले. ते आजतागायत सुरू आहे. पूर्वीच्या काळी मराठी भाषेचे स्वत्व जपण्यासाठी काही प्रयत्न झाले होते का?- हो, ही वस्तुस्थिती आहे. इ.स. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी भारतावर राज्य करायला सुरुवात केली. त्यांचा युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकल्यानंतर काही वर्षांनी इंग्रजी भाषेशी मराठी शिक्षित वर्गाचा परिचय होऊ लागला.इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे १९व्या शतकापासूनच भारतीय भाषांवर अतिक्रमण सुरू झालं. क्रिकेट, चित्रपट, रेडिओ, वीज इत्यादि गोष्टींचा आपल्याला त्या काळातच परिचय झाला. हे सर्व नवेच असल्यामुळे सुरुवातीला त्यासाठी योजलेले इंग्रजी शब्दच मराठी भाषेने स्वीकारले. कालांतरानं मराठी विद्वानांना जाणवलं, की या इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय शोधणं आवश्यक आहे. १८७९ साली जन्मलेल्या 'संदेश'कार अच्युत बळवंत कोल्हटकरांनी 'क्रिकेट' हा खेळ भारतीय जीवनाचं अविभाज्य अंग आहे हे लक्षात घेऊन फलंदाज, गोलंदाज, झेल, धाव, धावबाद, यष्टी, क्षेत्ररक्षक अशा अनेक संज्ञा मराठीत वापरायला स्वत: सुरुवात केली. कालांतरानं त्या मराठीत, विशेषत: लेखनात स्वीकारल्या गेल्या. त्याचप्रमाणे इतरही क्षेत्रांत विद्वानांनी पारिभाषिक संज्ञा सिद्ध केल्या. त्यातील बऱ्याचशा संज्ञा मराठीत रूढ झाल्याही. त्यानंतर पर्यायी शब्द सुचवण्याचं व्रत घेतलं ते स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी. १९२५च्या सुमारास जवळजवळ पाचशे पर्याय (मराठीत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी व उर्दू शब्दांना) त्यांनी सुचवले. विशेषत: परीक्षक, महाविद्यालय, प्राध्यापक, व्यंगचित्र, नगरपालिका, महापौर, नगरसेवक, चित्रपटगृह, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, वाचनालय, सचिव, क्रमांक, दैनंदिनी असे बरेच शब्द मराठीने स्वीकारले; मात्र उर्दू भाषेतील मराठीत एकरूप झालेल्या शब्दांना त्यांनी सुचवलेले पर्याय फारसे स्वीकारले गेले नाहीत. मराठी भाषेत पूर्णपणे सामावलेल्या उर्दू, फारसी, अरबी शब्दांची हकालपट्टी मराठी भाषेने मान्य केली नाही. उदा. मदत, गरीब, खराब, लायक, तयार, मालक, नुकसान असे कित्येक शब्द मराठी भाषेतून हद्दपार होणं शक्य नाही आणि तसं होताही कामा नये. माधवराव पटवर्धन (माधव ज्युलियन) यांनीदेखील मराठी भाषेची पीछेहाट रोखण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. भाषाभिवृद्धी ही नेहमीच इतर भाषांतील अनेक शब्द स्वीकारल्याने होत असते. ते शब्द व्युत्पत्तीने परभाषेतील असले, तरी ते मराठीच आहेत हे निश्चित.मराठी भाषेच्या संदर्भात सद्यस्थितीत परकीय शब्दांचा अतिरेकी वापर होत असल्याने मराठी भाषेची पीछेहाट होत आहे का? मराठी भाषक त्याला कितपत जबाबदार आहे?- याविषयी माझी काही सुस्पष्ट मतं आहेत. मला वाटतं, ज्याला इंग्रजी भाषेत पर्यायी शब्द नाहीत अशी इंग्रजी नामं स्वीकारल्यामुळे कोणतंही प्रदूषण होत नाही. उलट भाषा समृद्ध होते. पण मराठीत आशय अगदी सहजपणे व्यक्त करता येत असताना, अनावश्यक इंग्रजी शब्दांचा वापर करणं हे खरं भाषेचं प्रदूषण आहे. इंग्रजी शब्द मराठी भाषेत घुसडण्यात जो अहंकार व्यक्त होतो, तो भाषेच्या सुंदर रूपाला घातक आहे. स्वत:ला इंग्रजीचे विद्वान समजणारे अर्ध वाक्य इंग्रजीत तर पुढचं अर्ध वाक्य मराठीत बोलतात. ऐकणाऱ्यालाही त्यात काही चूक आहे असं वाटत नाही हे दुर्दैव. ‘रिअली स्पीकिंग, मला होमवर्क करायला आवडत नाही’, ‘मदरला माझे थॉट आवडतील’.. अशी ही वाक्यं.. या वाक्यांतील इंग्रजी शब्दांना मराठीत इतके सहज, सोपे पर्याय असताना इतरांना आपल्या इंग्रजी भाषेच्या प्रभुत्वाचा अचंबा वा आदर वाटावा म्हणून हे असं बोलणं किंवा लिहिणं हे भाषेतील प्रदूषण असह्य आहे. मराठी भाषेची दुर्दशा आपण मराठी भाषकच करतो. त्यामुळे मन विषण्ण होतं. मराठी भाषेतील प्रदूषण रोखण्यासाठी काय करायला हवं? मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढवणं हा यावरचा उपाय असू शकतो?- केवळ मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढवून हा प्रश्न सुटणार नाही. मराठी शाळा ओस पडत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्र शासनही मराठी शाळा बंद करण्याचा विचार करत आहे. तरुण पिढी तर मराठी ही आपली मातृभाषा आहे असं मानायलाही तयार नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे मराठीबद्दलची वाढती अनास्था धोकादायक आहे. मराठीची जपणूक करणं, तिचा प्रदूषणविरहित वापर करणं हे प्रत्येक मराठी भाषकाचं कर्तव्य आहे. ही जाणीव जोपर्यंत आपल्या सर्व मराठी माणसांत निर्माण होत नाही तोपर्यंत भाषेची ही चिरफाड दिवसेंदिवस वाढतच जाईल हे नि:संशय!- यास्मिन शेख(शब्दांकन : पराग पोतदार)