शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी ‘निजामी’ अन् अमृतमहोत्सवाची ‘हास्य जत्रा !’

By नंदकिशोर पाटील | Updated: September 21, 2023 08:48 IST

तेरा महिने उशिराने स्वातंत्र्य मिळालेल्या मराठवाड्याच्या वाट्याला मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवात काय आले? नियोजनशून्यता आणि सरकारी उपेक्षा!

सरकारी पातळीवर गांभीर्याचा अभाव आणि नियोजनशून्यता असेल तर काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच साजरा झालेला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा अमृतमहोत्सव वर्षपूर्ती समारंभ! मराठवाडा प्रांत निजामशाहीच्या जोखडातून मुक्त झाला असला तरी सरकारी पातळीवर निजामी मानसिकता अद्याप कायम असल्याचा प्रत्यय यानिमित्ताने आला. वर्षभरापूर्वी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. केंद्र सरकारच्या पुढाकाराने अमृतवर्षात देशभर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले गेले. मात्र, तेरा महिने उशिराने स्वातंत्र्य मिळालेल्या मराठवाड्याच्या वाट्याला उपेक्षाच आली. अमृतवर्षात ना कुठले कार्यक्रम झाले, ना समारंभ!

सांस्कृतिक खात्याने वर्षभरापूर्वी विविध उपक्रम साजरे करण्यासाठी गठीत केलेल्या जिल्हानिहाय समित्या कागदावरच राहिल्या. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली लावणी आणि हास्य जत्रेच्या कार्यक्रमांवर दौलत जादा करण्यात आली ! कार्यक्रमांची आखणी करताना मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य राखले गेले नाही. प्रबोधनाचा विसर पडलेले सांस्कृतिक खाते केवळ मनोरंजनासाठी आहे की काय, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.

मराठवाडा आर्थिकदृष्ट्या भलेही मागास असेल, मात्र सांस्कृतिकदृष्ट्या तितकाच संपन्न असा प्रदेश आहे. इसवी सनाच्या तेराव्या शतकापर्यंत गोदावरी खोऱ्यातील समृद्ध अशा मराठवाड्यात अनेक राजसत्तांचा उदय झाला. सातवाहन वंशाच्या काळात पैठण ही दक्षिणेतील संपन्न  राज्याची राजधानी होती. सातवाहनांच्या कालखंडात या प्रदेशात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य आणि कलाक्षेत्रात खूप प्रगती झाल्याचे दाखले इतिहासात मिळतात. सातवाहन, चालुक्य आणि राष्ट्रकुटांच्या काळातील अजिंठा, वेरूळ व पितळखोरे येथील लेणी या वैभवाची साक्ष आहेत. यादवकाळात तर येथील साहित्य, संगीत, नाट्यकला भरभराटीस आली. मराठी भाषेचा जन्म याच प्रदेशात झाला. आद्यकवी मुकुंदराज, भास्करभट्ट बोरीकर, वामन पंडित, मध्वमुनी, जनी जनार्दन, कृष्णदास ही कवी मंडळी याच भूमीतील!  संत ज्ञानेश्वर, नामदेव, विसोबा खेचर, जनाबाई, भानुदास, एकनाथ यांच्यापासून ते समर्थ रामदासांपर्यंत संतांच्या या मांदियाळीने या भूमीला वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ केले. वारकरी, नाथ, महानुभव संप्रदायाचा पाया याच मराठवाड्यात रचला गेला. या प्रदेशात मराठी, हिंदी, कानडी, तेलुगू आणि उर्दू अशा पाच भाषा अवगत असलेले अनेक लोक आहेत. अशा या कलागुण संपन्न प्रदेशातील लोकांच्या अभिरुचीचा विसर कदाचित सांस्कृतिक खात्याला पडला असावा, अथवा चटावरील श्राद्ध उरकण्याची घाई झाली असावी! 

मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम  रक्तरंजित  होता. हैदराबाद संस्थानात १९४८ पर्यंत आसफजाही घराण्यातील मीर उस्मान अली खानबहादूर निजामुद्दीन नामक सातव्या निजामाची राजसत्ता होती. या उस्मान अलीचा वकील कासिम रझवीने स्थापन केलेल्या रझाकारी सैन्याने या प्रदेशातील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. संस्थानातील बावीस हजार खेडी बेचिराख केली. या प्रदेशातील हुतात्म्यांच्या शौर्यगाथा अंगावर रोमांच आणतात. हा लढा केवळ मूठभर पांढरपेशा वर्गापुरता मर्यादित नव्हता. स्वामी रामानंदतीर्थांच्या नेतृत्त्वात अठरापगड जाती - जमातींचे असंख्य लोक यात सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग हे या लढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य. बदनापूरच्या दगडाबाई शेळके तर मराठवाड्याच्या राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जात. या रणरागिणीने निजामी सैन्याला सळो की पळो करून सोडले होते. या मुक्तिलढ्यातील असंख्य अनामविरांच्या शौर्यगाथा अद्याप अप्रकाशित आहेत. अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्याचा समग्र इतिहास प्रकाशित करून ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या, स्वातंत्र्य सेनानींच्या शौर्यकथा नव्या पिढीसमोर आणण्याची नामी संधी होती.

मराठवाड्यातील ऐतिहासिक वारसास्थळांची, पुरातन मंदिरांची आणि भुईकोट किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. वैश्विक वारसास्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांकडे जाण्यासाठी धड रस्ता नाही. दरवर्षी जगभरातील लाखो पर्यटक येतात. रस्त्यांची दुरवस्था पाहून त्यांचा हिरमोड होतो. पर्यटनाची राजधानी केवळ आता नावापुरतीच उरली आहे. अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने पर्यटन, सांस्कृतिक, क्रीडा खात्याने थोडी कल्पकता दाखवून कार्यक्रमांची आखणी करायला हवी होती. मुक्तिसंग्रामाचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर मांडता आला असता. परंतु, कल्पकतेचा अभाव असलेल्या सांस्कृतिक आणि पर्यटन खात्याने कोट्यवधी रुपये खर्चून अमृतमहोत्सवाची ‘हास्य जत्रा’ करून टाकली!

सहा वर्षाच्या खंडानंतर मराठवाड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रांताचा अनुशेष भरून काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, जुन्याच योजनांवर नवी कल्हई केलेला ४५ हजार कोटींचा संकल्प जाहीर करून सरकारने पाठ थोपटून घेतली. या निमित्ताने का होईना, पण मंत्री, संत्री अन्‌ जंत्रीचा मोठा लवाजमा घेऊन आलेल्या सरकारचे मुंबईबाहेर दोन दिवस छान पर्यटन झाले. हेही नसे थोडके!

नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत, छ. संभाजीनगर    nandu.patil@lokmat.com