शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

चेन्नईतील कहर व शासनाचे उत्तरदायित्व

By admin | Updated: December 4, 2015 02:12 IST

चेन्नई या तामिळनाडूच्या राजधानीसह त्या राज्याच्या उत्तर भागात पाऊस, पूर आणि वादळ यांनी जो कहर केला त्यात मृत्यू पावलेल्यांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर झाला नाही.

चेन्नई या तामिळनाडूच्या राजधानीसह त्या राज्याच्या उत्तर भागात पाऊस, पूर आणि वादळ यांनी जो कहर केला त्यात मृत्यू पावलेल्यांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर झाला नाही. मालमत्तेचे झालेले एकूण नुकसान स्पष्ट झाले नाही आणि साऱ्या देशभरातून आलेला मदतीचा ओघ छोटा वाटावा एवढे या आपत्तीचे स्वरुप विक्राळ आहे. रस्त्याच्या कडेने ठेवलेल्या मोटारी पाण्याच्या लोंढ्यातून वाहताना पाहाव्या लागल्या आणि विमानतळावरची विमाने पाण्यात नुसती अडलीच नाही तर तळाच्या कडेला वाहून जाऊन उलटीपालटी झालेली दिसली. मुंबईत झालेल्या पुराच्या आपत्तीला लहान ठरवील एवढा पाण्याचा हा आकांत चेन्नईच्या इतिहासातसुद्धा गेल्या सबंध शतकातला सर्वात मोठा ठरला. पाऊस अजून येत आहे, तो आणखी ४८ तास तसाच राहणार आहे आणि पाण्यात अडकलेल्या लोकांसमोरचे जीवनमरणाचे संकट अजून संपले नाही. याआधी जपानमध्ये आलेल्या समुद्री संकटात पाहावी लागली तशी मोटारींची व विमानांची वाहत जाऊन झालेली नासधूस परवा चेन्नईत पाहावी लागली. एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देता येईल एवढी समर्थ यंत्रणा देशात नाही. तिच्या अपुरेपणाचा अनुभव देशाने आजवर अनेकदा घेतलाही आहे. मात्र चेन्नईचे संकट आताच्या यंत्रणेचाही पुरता बोजवारा उडविणारे, सरकारची हतबलता उघड करणारे आणि सामान्य माणसांची अशा संकटकाळात प्रगटणारी इच्छाशक्ती व सामाजिक भावना स्पष्ट करणारे ठरले. सरकार थकले तेव्हा साधी माणसे उभी राहिली. त्यांच्या संघटनांनी घराघरात अडकलेली आणि गळ््याएवढे पाण्यात बुडालेली माणसे बाहेर काढण्याची शिकस्त केल्याचे दिसले. आपत्तीच्या काळात समाजात येणारे हे एकीचे बळ हाच त्याच्या संघटित वृत्तीचा व सामर्थ्याचा खरा साक्षात्कार असतो. चेन्नईच्या संकटात याच वृत्तीने अनेकांना बळ दिले व जगविले आहे. मात्र निसर्गाचा कोप म्हणून अशा आपत्तीकडे यापुढे नुसतेच पाहाता येणार नाही. मुंबईतील पुराचे संकट, तिथली मिठी नदी लोकांनी व बिल्डरांनी अतिक्रमण करून बुजविल्यामुळे मोठे बनले. कधीकाळी जिवंत व वाहत्या असणाऱ्या मिठीने आपल्यावरील अतिक्रमणाचा तेव्हा सूडच उगविलेला महाराष्ट्राला दिसला. चेन्नईतील संकटाचे असे मानवनिर्मित स्वरुपही यानिमित्ताने पाहावे असे आहे. त्या शहरातील व शहराभोवतीची ६०० हून अधिक तळी बिल्डरांनी आणि अतिक्रमकांनी त्यांच्या राक्षसी आकांक्षेपायी बुजवून त्यावर मोठाल्या इमारती आणि मॉल्स उभे केले. चेन्नईतून वाहणाऱ्या अड्यार या छोट्याशा नदीचे पात्रही या अतिक्रमकांनी संकुचित करून तिची अडवणूक करण्याचा मार्गही अवलंबिला. आताच्या पुराने या साऱ्या बुभुक्षितांच्या अतिक्रमणाचे पाप अधोरेखित केले असले तरी यापुढे ते कायमचे थांबेल याची शक्यता कमी आहे. बिल्डरांची भूक मोठी आहे आणि राजकारणी माणसांशी असणारे त्यांचे देशभरातील संबंध साऱ्यांना ठाऊक आहेत. मुंबईतील पुराने त्या शहराला व त्यातल्या कर्त्या माणसांना आजवर कितीसे व काय शिकविले? त्या शहरातील माणसांना दरवर्षी पावसाळी परीक्षा अजून द्यावी लागते. राज्याचे सरकार, महापालिका आणि नेत्यांचे वर्ग तेथे एकत्र असतानाही दरवर्षी येणाऱ्या या आपत्तीला त्यांनी कितीसे तोंड दिले? पाश्चात्त्य देशातही नद्यांना पूर येतात, वादळे होतात आणि त्सुनामीसारखी संकटेही येतात. पण त्यातली मोठी शहरे अशी सर्वतोपरी पाण्याखाली जात नाहीत. प्रत्येक मोठ्या शहरात अतिरिक्त पाण्याचा निचरा करता येणाऱ्या मोठ्या यंत्रणा कार्यरत असतात आणि त्या सुस्थितीत राहतील याची कायम तजवीज केली जाते. आपत्ती नियंत्रणाची यंत्रणा या नावाची बाब आपल्याकडेही आहे. मात्र ती असावी तेवढी सावध कधीच नसते आणि येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्याएवढी ती सक्षमही नसते. अशा संकटाच्या वेळी आपल्याकडे सरकारी मदतीचे आकडे जाहीर होतात. लष्कर, नाविकदल आणि हवाईदलाच्या तुकड्या मदतकार्यासाठी पाठविल्या जातात. आणि पुढारी? ते पूर ओसरू लागल्यानंतर हेलिकॉप्टरांमधून त्याची हवाई पाहाणी करतात. अगदीच काही न करण्यापेक्षा हे करणे बरे असले तरी ते पुरेसे नाही. चेन्नईत वीज पुरवठा बंद आहे. वाहतूक थांबली आहे. बाहेरची वाहने येऊ शकत नाहीत. विमानतळावरील उड्डाणेही थांबविली गेली आहेत. बाजार बुडाला आणि तळमजल्यावर राहणारी माणसे आपल्याजवळचे अन्नधान्य व सारे किडुकमिडुक गमावून बसली. सगळे मानवी प्रयास कुचकामी ठरावे आणि आकाशाचा कहर साऱ्यांहून मोठा ठरावा अशी ही स्थिती आहे. या स्थितीला काही स्वार्थी लोकांचा हातभारही लागला आहे. अशा आपत्तींचे निवारण करायचे तर राजकारणालाच आपला स्वार्थ बाजूला ठेवून बिल्डरांच्या मुसक्या आवळण्याची तयारी केली पाहिजे. शिवाय अतिक्रमण करणाऱ्यांचा आणि शहरात व गावात असणारी तळी वा नदीनाले बुजवून टाकणाऱ्यांचा कठोर बंदोबस्त केला पाहिजे. मुंबई आणि चेन्नईसारखी देशातली महत्त्वाची शहरे या आपत्तीतून मुक्त राहणार नसतील तर देशातील इतर लहानसहान शहरांची व खेड्यांची अवस्था अशावेळी कशी होऊ शकेल याचा भीषण धडाच या संकटाने साऱ्यांसमोर उभा केला आहे.