शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
5
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
6
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
7
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
8
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
10
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
11
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
12
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
13
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
14
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
15
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
16
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
18
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
20
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...

इमामाचा शाही हुच्चपणा

By admin | Updated: November 7, 2014 04:01 IST

त्यांचा हा पवित्रा केवळ बेकायदेशीर व घटनाविरोधीच नव्हे, तर समाजविरोधीही आहे. इमामाचे पद वंशपरंपरेने चालणारे व बापाकडून मुलाकडे येणारे आहे

१९७५ची आणीबाणी उठल्यानंतरच्या काळात दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचा राजकारणातला भाव एकदम वधारला होता. आणीबाणीत अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित अत्याचारांमुळे त्या समाजात काँग्रेसविषयीची संतापाची भावना होती आणि शाही इमाम त्या भावनेचे प्रवक्ते होते. आणीबाणीनंतर १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ‘काँग्रेसला मत न देण्याचा व जयप्रकाशजींच्या नेतृत्वातील जनता पक्षाला मत देण्याचा’ फतवाच या इमामांनी काढला होता. त्याचा मुस्लिम समाजावर किती परिणाम झाला हे कळायला तेव्हा मार्ग नव्हता. मात्र, त्या घटनेने ते वजनदार मुस्लिम पुढारी असल्याचा गवगवा देशभर झाला होता. पुढे या इमामांनी तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांना ‘मी सांगेन ते दोन मुस्लिम प्रतिनिधी तुमच्या मंत्रिमंडळात घ्या’ असेही बजावले होते. मोरारजीभार्इंनी अर्थातच ते फारसे मनावर घेतले नाही. त्यानंतरच्या काळात मात्र इमामांचे वजन हळूहळू कमी होत गेले. देवबंदच्या वजनदार धर्मपीठाने (दारुल उल उम) या इमामांचे न ऐकण्याचा सल्ला धर्मबांधवांना दिला, तर काहींनी त्यांचा अधिकार दिल्लीच्या जामा मशिदीपुरता मर्यादित आहे, असे सुनावले. मध्यंतरी एका वाहिनीवर या इमामांशी वाद घालताना शबाना आझमी या नटीने त्यांना ‘तुम्हीच शस्त्रे घेऊन सीमेवर लढायला का जात नाही’ असा प्रश्न विचारून त्यांची कोंडी केली होती. सारांश, आपला प्रभाव असा घालवून बसलेले हे इमाम परवा पुन्हा एकवार लोकचर्चेत आले. आपल्या १७ वर्षांच्या चिरंजीवाला आपली गादी देण्याचा व त्याचा सोहळा करण्याचा इरादा करून त्यांनी देश-विदेशातील अनेक वजनदारांना त्या सोहळ्याला हजर राहण्याची निमंत्रणे पाठविली. तसे एक विशेष निमंत्रण त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही पाठविले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र त्यांनी ते पाठविले नाही. मोदींच्या मंत्रिमंडळातील राजनाथसिंहांसह इतर काही मंत्र्यांना व मुख्तार अब्बास नकवी या भाजपाच्या प्रवक्त्यालाही त्यांनी निमंत्रण पाठविले. ‘नरेंद्र मोदींना निमंत्रण का दिले नाही’ या प्रश्नाचे जे उत्तर इमामांनी दिले, ते कमालीचे प्रक्षोभक व राजकीय स्वरूपाचे आहे. ‘गुजरातमधील दंगलीत मुसलमानांची जी कत्तल झाली त्याबद्दल मोदींनी अजून क्षमा मागितली नाही; म्हणून त्यांना निमंत्रण नाही’ असे या इमामांनी सांगून टाकले. हे उत्तर जाहीर होताच इमामांचे निमंत्रण नाकारण्याचे पहिले राजकीय धारिष्ट्य काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले. ‘पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण देणारे इमाम भारताच्या पंतप्रधानांना निमंत्रण देत नाहीत, हा प्रकार राजकीय असून तो मान्य होण्यासारखा नाही’ असे त्या म्हणाल्या. सोनिया गांधींचे अनुकरण करायला दुसरे कोणी पुढे आलेले अजून तरी दिसले नाही. शाही इमामाचा अतिरेक आणखी असा, की ही निमंत्रणे पाठवीत असताना आपण भारतातील मुसलमानांचे एकमेव प्रतिनिधी असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. त्यांचा हा पवित्रा केवळ बेकायदेशीर व घटनाविरोधीच नव्हे, तर समाजविरोधीही आहे. इमामाचे पद वंशपरंपरेने चालणारे व बापाकडून मुलाकडे येणारे आहे. त्यांना कोणी निवडून दिले नाही आणि मशिदीच्या बाहेर त्यांचा फारसा प्रभावही कुठे नाही. देशातील मुसलमानांच्याच नव्हे, तर साऱ्या जनतेच्या प्रतिनिधित्वावर हक्क सांगण्याचा अधिकार सरकार व संसदेचा आहे. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा तो हक्क आहे. वंशपरंपरेने एखाद्या गादीवर आलेल्याने तसा अधिकार सांगणे हा संपलेल्या व इतिहासजमा झालेल्या राजेशाहीचा वारसा आहे. मात्र, शाही इमाम काय किंवा दुसऱ्या कोणत्या धर्माचे महंत काय, त्यांना वर्तमानाशी फारसे देणेघेणे नसते. ते इतिहासात जगतात आणि भूतकाळातच रमतात. आपण अजून तख्तन्शीन आहोत आणि आपल्या अंगावर जुनीच धर्मवस्त्रे आहेत, या भ्रमातून ते बाहेर पडत नाहीत. त्यामुळेच शाही इमामाचे आताचे वर्तन एवढ्यावर सोडून देता यायचे नाही. भारतातील मुसलमानांचा मीच एकटा प्रतिनिधी आहे, असे म्हणताना या इमामाने त्या वर्गाचे सरकार करीत असलेले प्रतिनिधित्व नाकारले आहे. तसे ते नाकारत असल्याचे पाकिस्तानच्या सरकारला कळविण्याचा उद्दामपणाही त्याने केला आहे. हे वागणे बेकायदा तर आहेच, शिवाय ते देशातील देशभक्त मुसलमान बांधवांनाही मान्य होण्याजोगे नाही. मोदींचे सरकार आज सत्तेवर आहे आणि त्याला मत देणारे वा न देणारे अशा साऱ्याच नागरिकांचे प्रतिनिधित्व त्याच्याकडे आहे. अशा वेळी ‘मीच येथील मुसलमानांचा एकमेव नेता, प्रवक्ता व प्रतिनिधी आहे’ असे या इमामाने विदेशांना सांगत सुटणे हा देशविरोधी अपराध आहे आणि त्याची योग्य ती कायदेशीर दखल घेणे गरजेचे आहे.