शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी राज्यात अघोरीराज !

By admin | Updated: January 3, 2015 22:31 IST

सुखप्राप्तीसाठी मुलाने आपल्या आई आणि मावशीचा बळी देण्याच्या नाशिक जिल्ह्यातील घोटी परिसरातील धक्कादायक घटनेने साऱ्यांनाच सुन्न केले.

सुखप्राप्तीसाठी मुलाने आपल्या आई आणि मावशीचा बळी देण्याच्या नाशिक जिल्ह्यातील घोटी परिसरातील धक्कादायक घटनेने साऱ्यांनाच सुन्न केले. अंधश्रद्धेपासून दूर राहा, ही महाराष्ट्राच्या मातीतील संतांची शिकवण. मात्र भौतिक सुखापोटी अंधश्रद्धेतून बळी देण्याचा हा अघोरी प्रकार याच पुरोगामी परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रात घडावा, हे अघोरीराजच म्हणावे लागेल. या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलनाचा हा वेध...

 

महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाला तब्बल ३०० वर्षांची परंपरा आहे. अनेक संतांनी, त्यानंतर महात्मा फुले, संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व गेल्या २५ वर्षांत तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संघटितपणे यासाठी प्रयत्न केले आहेत. तरीही अंधश्रद्धा कमी न होता वाढतच चालली आहे. गेल्या वर्षभरात म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा झाल्यापासून महाराष्ट्रात सुमारे १२ प्रकार केवळ नरबळीचे झाले आहेत. याचा अर्थ हे प्रमाण दर महिन्याला एक असे आहे व ही अत्यंत गंभीर बाब आहे.असे होण्याची कारणे आपल्याकडच्या सामाजिक परिस्थितीत आहेत, असे गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून लक्षात आले आहे. आपल्याभोवताली सुखोपभोगाची अनेक साधने निर्माण झाली आहेत. त्याचा लाभ घेतानाही अनेक जण दिसतात. मात्र ही संख्या मर्यादित आहे. असा लाभ घेणाऱ्या लोकांना पाहणारे अनेक आहेत़ त्यांनाही वाटते आपण असे करावे, मात्र ती साधने त्यांना सहज उपलब्ध होत नाहीत. त्यातून त्यांच्यातील असमाधान वाढीला लागते. एक प्रकारची अगतिकता त्यांच्यात निर्माण होते. त्यांच्याकडे आहे, आपल्याकडे का नाही, कसे मिळवता येईल, अशी ही भावना आहे. अशी वर्गीय दरी आपल्याकडे फार झपाट्याने वाढत आहे. प्रत्येकाला कोणतीही गोष्ट लगेच, तत्काळ हवी आहे़ ती मिळेपर्यंत वाट पाहण्याची, थांबण्याची त्यांची तयारी नसते. ती लवकर मिळावी, यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. त्यातूनच मग नको तो मार्ग निवडला जातो.सुशिक्षित तरुण पिढीही यात मागे नाही. प्रयोगशाळेत प्रयोग करणारी मुले त्या वेळी कार्यकारणभाव विचारात घेऊनच प्रयोग करीत असतात. आपल्या जगण्यात हा विचार आणणे मात्र त्यांना जमत नाही. नरबळीसारखा प्रकार घडल्यावरच आपल्याला अंधश्रद्धेमधील दाहकता लक्षात येते. प्रत्यक्षात रोजच्या जगण्यातही आपण अनेकदा अविवेकाने वागत असतो. नवस केल्यावर, हात जोडल्यावर काही होईल ही भावना याचेच प्रतीक आहे. कोणत्याही परिस्थितीत कार्यकारणभाव म्हणजे विवेकाची कसोटी लावणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र अगतिक स्थितीत हा विवेकच हरवला जातो व त्यातून असे लहानसहान व नंतर मग गंभीर प्रकार घडतात.मांत्रिक व तत्सम प्रकारच्या व्यक्ती खतपाणी घालतात. त्यातून विवेकासमोर अंधार पसरतो व अविवेक जागृत होतो. त्याला आळा घालायचा असेल तर त्यासाठी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच सामाजिक प्रबोधनदेखील होण्याची गरज आहे, जे आपल्याकडे होताना दिसत नाही. जादूटोणाविरोधी कायदा होण्यापूर्वी नरबळी देण्यासाठी तयारी करणे, हा गुन्हा समजला जात नव्हता. आता मात्र या कायद्यामुळे तो गुन्हा समजला जातो व सिद्ध झाल्यावर त्यासाठी शिक्षादेखील आहे. असे बदल करून तो कायदा अधिक टोकदार करण्याची गरज आहे. कायद्याची अंमलबजावणी होत नाही, ही सुद्धा खंत वाटावी अशीच गोष्ट आहे. अचानक झालेले मृत्यू शोधून त्यामागील कारणांचा पोलिसांनी शोध घेतला, तर त्यातून अनेक गंभीर प्रकार सापडू शकतील. असा शोध सुरू आहे, अशी माहिती प्रसिद्ध झाली तरीही नरबळीसारखे अनेक प्रकार टळू शकतील. याशिवाय शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा यातून प्रबोधन होण्याची गरज आहे. समितीच्या माध्यमातून असे उपक्रम होतच असतात. मात्र थेट समाजातून यासाठी गावोगाव युवक उभे राहिले पाहिजेत. सुरुवातीला विरोध होईल, मात्र एकदा भूमिका लक्षात आली तर त्याचे निदान महाराष्ट्रात तरी स्वागतच होईल, अशी मला खात्री आहे. ही सुरुवात मात्र लवकर झाली पाहिजे; कारण शेजारच्या मुलीला, नात्यातील एका महिलेला असे करता करता आता प्रकरण थेट मुलाने आईला बळी देण्यापर्यंत येऊन ठेपले आहे. समाजाचा विवेक जागा व्हावा, यासाठी आता समाजानेच प्रयत्न करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. (शब्दांकन : राजू इनामदार)

- मुक्ता दाभोलकरअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ पदाधिकारी.